लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : घरची परिस्थिती तशी बेताचीच...पतीचा चहापावडर विक्रीचा व्यवसाय...संसाराच्या वेलीवर तीन कळ्या उमललेल्या...सारं काही आनंदात सुरू होते. पण २६ जानेवारी २००६ या दिवशी नयन नितीन पवार यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पतीने आकस्मिक निधन झाले. पदरात तीन मुली, आर्थिक स्थिती म्हणावी तितकी चांगली नाही. अशा परिस्थितीत त्यांनी पतीचा व्यवसाय स्वत:च करण्याचा निर्णय घेतला. संकटांशी दोन हात करत त्यांनी मुलींना उच्चशिक्षित करण्याचा निर्धार केला. चिकाटी, जिद्द आणि अपार कष्ट करण्याची तयारी या जोरावर त्यांनी चहापावडर विकून स्वत:चा संसार तर सावरलाच, शिवाय मुलींनाही उच्च शिक्षणाची दारे खुली करून दिली.
शहरातील रमामातानगरमधील माने प्लाॅटमध्ये नयन पवार या तीन मुली व आईसोबत राहतात. घराचे नावही ‘समाधान’; पण कष्टाशिवाय समाधान मिळत नाही, असे म्हटले जाते, त्याची प्रचिती पवार यांच्या कहाणीतून समोर येते. वयाच्या १९ व्यावर्षी त्यांचे लग्न झाले. त्यांचे पती नितीन पवार हे चहापावडर विकून घराचा गाडा चालवित होते. त्या स्वत: चहाच्या दुकानात काम करीत होत्या. संसाराच्या वेलीवर तीन कळ्या उमललेल्या. कष्टाचे दिवस असूनही सुखाला तोटा नव्हता. पण २६ जानेवारी २००६ रोजी नितीन यांचे अचानक निधन झाले आणि हसत्या-खेळत्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यातून कसेबसे सावरत नयन पवार यांनी कुटुंबाची सूत्रे हाती घेतली.
नयन पवार यांना पुढे शिकण्याची इच्छा होती. पण १२ वीनंतर त्यांना शिक्षण सोडावे लागले. आपल्या तीनही मुलींना उच्चशिक्षित बनविण्याची खूणगाठ बांधून त्या कामाला लागल्या. पतीचा चहापावडर विकण्याचा व्यवसाय पुन्हा सुरू केला. आधीच्या उधारीच्या वसुलीसाठी त्या दारोदार जात होत्या. काहींनी घरात आणून चहापावडरची उधारी दिली; तर काहींनी टोलवाटोलवी केली. त्या परिस्थितीशी जुळवून घेत त्यांनी घराघरात जाऊन चहापावडरची विक्री सुरू केली. सुरुवातीला पायीच त्या फिरत होत्या. थोड्या दिवसात त्यांनी सायकल शिकून घेतली. पतीच्या निधनानंतर नातेवाईकांनी, मुलींना फार न शिकविता लग्नं करू द्या, असा सल्ला दिला होता. पण त्यांनी मात्र मुलींना शिकवून मोठे करण्याचा निर्धार केला होता. मुली जसजशा पुढच्या इयत्तेत जात होत्या, तसे आर्थिक गणित जुळवताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यातून त्यांनी शिकवणीचे वर्ग सुरू केले. तीनही मुली शाळेत हुशार होत्या. दहावी, बारावीत चांगले गुण होते. त्यांनी कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात प्रावीण्य मिळविले होते. मोठी मुलगी गायत्रीने काॅम्प्युटर सायन्स करुन पुढे एमएसडब्ल्यू केले, तर दुसरी मुलगी रक्षंदा इलेक्ट्राॅनिक्स इंजिनिअर झाली आहे. धाकटी नंदिता तर दहावीला जिल्ह्यात पहिली आली होती. तिचे सीए बनण्याचे स्वप्न आहे. अजूनही नयन पवार या चहापावडर विक्रीचा व्यवसाय करतात. आता मुलींकडून त्यांना संसाराचा गाडा हाकण्यासाठी मदत होत आहे.