ऐवतडे बुद्रुक : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भारतीय संविधान हाती घेऊन वधू-वरांनी विवाहवेदीवर प्रवेश केला. मान्यवरांच्यासमवेत संविधानाचे जाहीर वाचन करून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. समाजप्रबोधनाचा सत्यशोधक विवाह इस्लामपूर येथे पार पडला.
वशी (ता. वाळवा) येथील वसंत निवृत्ती पाटील यांचे चिरजीव सुनील व ब्रम्हनाळ (ता. पलूस) येथील शिवाजी भगवान गडदे यांची कन्या माया यांचा २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन हाच सर्वश्रेष्ठ मुहूर्त मानून पारंपरिक विधींना फाटा देऊन सत्यशोधक पध्दतीने विवाह झाला.
लग्नासाठी होणारा अनावश्यक खर्च टाळून तोच खर्च गोरगरिबांच्या सेवेसाठी मदतीचा हात म्हणून करण्यात आला. यामध्ये पारंपरिक ऊसतोड कामगारांना आरोग्यवर्धक वाफारा मशीन, विवाहप्रसंगी उपस्थित मान्यवरांना थोर महापुरूष यांचे ग्रंथ देणे, तसेच एका गरीब मुलीचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलणे यासारख्या उपक्रमाबरोबर वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, नेत्रदान व अवयवदान अर्ज भरून घेणे, राष्ट्रपुरूष व महाराष्ट्राची क्रांतिभूमी मानल्या जाणाऱ्या वाळवा तालुक्यातील क्रांतिकारकांच्या पुतळ्यांना अभिवादन करणे अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन जनक्रांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी व वाळवा पंचायत समिती माजी सदस्य प्रकाश पाटील व सांगली जिल्ह्यातील पुरोगामी व्यक्तींनी यशस्वीपणे केले.
प्रा. डॉ. विजय गायकवाड यांनी महात्मा जोतिराव फुलेंनी रचलेल्या सत्यशोधकी मंगलअष्टका गाऊन फुलांची उधळण करून सत्यशोधक विवाह केला. संत गाडगेबाबांच्या वेशातील प्रा. विजयकुमार जोखे, सत्यजित देशमुख, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, उद्योगपती सर्जेराव यादव उपस्थित होते.
फोटो - २९०१२०२१-आयएसएलएम-वशी न्यूज
वशी (ता. वाळवा) येथील सुनील पाटील व ब्रम्हनाळच्या माया गडदे यांच्या सत्यशोधक विवाहानंतर पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्याहस्ते वधु-वरांना शुभेच्छा देण्यात आल्या.