अविनाश कोळी ल्ल सांगलीपक्षांतर्गत गटबाजी, आतापासूनच सुरू झालेल्या कुरघोड्या आणि बहुरंगी लढतीच्या दाट शक्यतेने सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस व भाजपमधील प्रमुख दावेदारांची डोकेदुखी वाढली आहे. विरोधी उमेदवाराशी लढण्यापूर्वी या दोन्ही पक्षातील इच्छुकांना सुरुवातीला स्वकीयांशीच संघर्ष करावा लागण्याची दाट शक्यता दिसत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. यंदा तो ढासळला, मात्र सांगली विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला, तर येथे आजवर इतर पक्षांनीही यश मिळविल्याचे दिसते. १९६२ नंतर १९८५ पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यानंतर जनता दल, भाजप व अपक्ष उमेदवारही विजयी झाले. २००९ च्या निवडणुकीत प्रथमच भाजपचा उमेदवार विजयी झाला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीवर लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे परिणाम स्पष्टपणे जाणवत आहेत. भाजपला मिळालेल्या यशामुळे काँग्रेसची चिंता वाढली आहे. सांगली विधानसभा मतदारसंघातही खासदार संजय पाटील यांना ४२ हजार ७५६ मतांचे अधिक्य मिळाले आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला गटबाजीमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. विद्यमान आमदार संभाजी पवार यांनी त्यांचे पुत्र पृथ्वीराज पवार यांच्या उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह धरला आहे. त्याचवेळी पवार कुटुंबियांनी लोकसभा निवडणुकीत केलेल्या बंडाचा दाखला देत पदाधिकाऱ्यांचा एक गट त्यांच्याविरोधात उभा आहे. कोणत्याही परिस्थितीत पवारांच्या कुटुंबात उमेदवारी दिली जाऊ नये, यासाठी या गटाने ‘फिल्डिंग’ लावली आहे. भाजपच्या इच्छुकांच्या यादीत प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, सुधीर गाडगीळ, हणमंत पवार यांचा समावेश आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष दिनकर पाटीलही भाजपकडून उमेदवारी मिळविण्याच्या तयारीत आहेत. भाजपशी वाढलेली त्यांची सलगीही राष्ट्रवादीच्या चिंतेचा विषय बनली आहे. भाजपकडे इच्छुकांची गर्दी झाली आहे. उमेदवारी कोणालाही मिळाली, तरी नाराजी व गटबाजीच्या परिणामांशी अधिकृत उमेदवाराचा सामना होणार हे निश्चित. आ. संभाजी पवारांनी पृथ्वीराज यांना उमेदवारी मिळणार हे गृहित धरूनच तयारी सुरू केली आहे. मतदारसंघात भेटीही सुरू केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी केलेल्या बंडामुळे यंदा उमेदवारी मिळविताना त्यांना कसरत करावी लागणार आहे. काँग्रेसमध्येही यंदा पक्षांतर्गत नाराजी आहे. काँग्रेसच्या उमेदवारीसाठी मदन पाटील यांना प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे दिगंबर जाधव यांनी मदन पाटील यांच्यावर निष्क्रियतेची टीका केल्याने पक्षांतर्गत वातावरण तापले आहे. दुसरीकडे पालकमंत्री पतंगराव कदम यांनी प्रत्येक मतदारसंघातून किमान तीन इच्छुकांची नावे घेऊन तसा अहवाल प्रदेश कार्यकारिणीला पाठविण्यात येईल, असे सांगून अनेकांच्या स्वप्नांना बळ दिले. लोकसभा निवडणुकीत गटबाजीचा फटका बसल्याने विधानसभा निवडणुकीतही याची भीती काँग्रेसला वाटत आहे. सध्या महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. मदन पाटील यांच्याकडेच महापालिकेचे नेतृत्व असल्यामुळे त्यांची मदार नगरसेवकांवर अधिक आहे.
सांगलीत भाजप, कॉँग्रेसला स्वकीयांचाच ताप!
By admin | Updated: June 11, 2014 01:04 IST