आटपाडी : आटपाडी तालुक्यातील दहा गावांसाठी जलजीवन योजनेतून मंजुरी मिळाली आहे. यासाठी पाच कोटी ५७ लाख आठ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या प्रयत्नामुळे तालुक्याला निधी मिळाला आहे, अशी माहिती आटपाडी पंचायत समितीच्या सभापती पुष्पाताई सरगर यांनी दिली.
पुष्पाताई सरगर म्हणाल्या की, आटपाडी तालुक्यातील ४३ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न राष्ट्रीय पेयजल योजनेतून सोडवला आहे. उर्वरित दहा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तो जलजीवन योजनेच्या माध्यमातून पूर्ण झाला असून, तालुक्यातील मानेवाडी, कानकात्रेवाडी, पारेकरवाडी, घानंद, माडगुळे, वाक्षेवाडी, मुढेवाडी, बनपुरी, माळेवाडी, लेंगरेवाडी या दहा गावांच्या पाणी योजनेला मंजुरी मिळाली आहे. आटपाडी तालुक्यातील ४३ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुढील तीन महिन्यांमध्ये सुटणार आहे. बाकीच्या गावांच्या पिण्याचा प्रश्नही सुटणार असून, कामे अंतिम टप्प्यात आहेत. गोपीचंद पडळकर, राजेंद्रअण्णा देशमुख यांनी योजनेला मंजुरी मिळवण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. आटपाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज भोसले, जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य व पंचायत समितीच्या सर्व सदस्य व अधिकारी यांच्या प्रयत्नातून आटपाडी तालुक्यातील सर्व गावांचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे.