लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गेल्या दीड वर्षांपासून कायम असलेला कोरोना संसर्ग आणि त्यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन पुरते बाधित झाले आहे. या पार्श्वभूमीवर गोरगरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शासनाकडून मोफत धान्य पुरविण्यात येत असले तरी हेच धान्य आता विकलेही जाऊ लागले आहे. गेल्यावर्षी पोलिसांनी राईस मिलवर कारवाई, तांदूळ पकडला असला तरी आता मात्र, लाभार्थींकडेच धान्य अधिक झाल्याने अनेकजणांनी विक्रीचा फंडा अवलंबवला आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसह राज्य शासनाकडूनही लाभार्थ्यांना गहू व तांदूळ मोफत दिले जात आहे. कुटुंबातील सदस्य संख्या कमी असल्याने अनेकांकडे धान्य शिल्लक राहत आहे. त्यामुळे अगदी नाममात्र किमतीत या धान्याची विक्री होते आहे. प्रशासनाला याबाबत कारवाई करण्यासही अडचणी येत आहेत.
चौकट
इडली, डोसासाठी तांदूळ
इतर कोणत्याही तांदळापेक्षा रेशनच्या तांदळापासून इडली व डोसा चांगला तयार होत असल्याची भावना असल्याने अनेकजण केवळ यासाठी तांदूळ विकत घेत आहेत, तर काही दुकानदार गहू इतर गव्हांमध्ये मिक्स करण्यासाठी खरेदी करीत असल्याचे दिसून आले.
चौकट
जादाचे धान्यामुळे अडचण
शासनाकडून दुर्बल घटकांना नियमितपणे धान्याचा पुरवठा करण्यात येत आहे. यात खंड न पडल्याने अनेक जणांकडे धान्याची साठवणूक झाली आहे. हे धान्य खराब होण्यापेक्षा त्याची विक्री करण्यात येत आहे.
चौकट
गव्हाऐवजी ज्वारी
लाभार्थ्यांना गहू वाटप होत असले तरी प्रत्यक्षात अनेकजण चपातीऐवजी भाकरी खाणेच पसंत करतात. त्यामुळे काही लाभार्थी गव्हाची विक्री करून त्यातून ज्वारीची खरेदी करीत असल्याचे दिसून आले.
कोट
शासनाकडून लाभार्थ्यांना मोफत धान्याचा पुरवठा त्यांच्यासाठी होत असला तरी त्याची विक्री करणे चुकीचे आहे. त्याशिवाय या धान्याचा गैरवापर करणाऱ्यावर यापूर्वी कारवाई झाली आहेत यापुढेही तथ्य आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल.
वसुंधरा बारवे, जिल्हा पुरवठा अधिकारी.