सांगली : माधवनगर येथील सागर ज्वेलर्समधून चोरट्यांनी १५ तोळ्याचे सोने आणि चांदीचे दागिने असा सुमारे आठ ते साडेआठ लाखांचा ऐवज लंपास केला. संशयित चोरट्यांनी वापरलेल्या गाडीचा शोध सुरू असून, यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाची मदत घेतली जात आहे, असे सहायक निरीक्षक काकासाहेब पाटील यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत ५० जणांची चौकशी करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी दत्ताजी साळुंखे यांचे माधवनगरमधील बुधवार पेठेत ज्वेलर्सचे दुकान आहे. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास साळुंखे ज्वेलर्स दुकान उघडले. घरातून १५ तोळ्याच्या सोन्याच्या आणि चांदीच्या दागिन्यांची बॅग त्यांनी आपल्या दुकानांतील काऊंटरच्या आतील बाजूस ठेवली होती. त्यावेळी संशयित दोघे चोरटे दुकानात आले. तुमचे पैसे दुकानाबाहेर पडले आहेत, असे सांगितले. साळुंखे हे पैसे घेण्यासाठी दुकानाबाहेर गेले. तितक्यात एका युवकाने दुकानात काऊंटरवर ठेवलेली बॅग घेतली. त्यानंतर दोघेही पसार झाले. संशयित चोरटे पोलिसांच्या रडारवर आहेत.