सांगली : कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णांना दिलासा देण्यासाठी उद्योजक समीर पाटील, सौ. स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील राॅयल युथ फौंडेशन व मावळा प्रतिष्ठान पुढे सरसावले आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऋषिकेश पाटील यांच्या वाढदिनानिमित्त वर्षभरात पाच हजार रक्त बाटल्यांचा संकल्प करण्याचा निर्धार केला आहे. गेल्या चार दिवसांत सुमारे हजार बाटल्यांचे संकलन झाले आहे.
उद्योजक समीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली राॅयल फौंडेशन, मावळा प्रतिष्ठान आणि दक्षिण शिवाजीनगर कला, क्रीडा सांस्कृतिक मंडळाने गेल्या काही वर्षात शहरात विविध उपक्रमांद्वारे जनतेत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. महापुराच्या काळात ऋषिकेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण टीम सांगलीकरांच्या मदतीला धावली होती. कोरोनाच्या काळातही मंडळाच्यावतीने नागिरकांना मदतीचा हात दिला आहे. नागरिकांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. कोरोना योद्धा पोलिसांना फेस शिल्डही देण्यात आले. शहर स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून आपली सांगली, चांगली सांगलीचा संदेशही देण्यात आला.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऋषिकेश पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महारक्तदान व नेत्रदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योजक समीर पाटील यांच्या उपस्थितीत या उपक्रमाला सुरुवातही झाली. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून चार दिवसांत १ हजार बाटल्याचे संकलन करण्यात आले. शिबिराचे संयोजन फौंडेशनचे अक्षय सावंत, रमिज तांबोळी, ऋषभ पाटील, अनिकेत डोंबाळे, जयसिंगपूरचे अभिजित पाटील, आदित्य धनवडे, सुनील कोकरे, आटपाडीचे सागर पाटील, पलूसचे अमीर मुल्ला, शुभम् सूर्यवंशी, ऋषिकेश कदम, तासगावचे अमित जाधव, अनिकेत जाधव, सत्यम खरमाटे, शुभम् खरमाटे आदींनी केले आहे.
चौकट
समीर पाटील यांचे रक्तदान
उद्योजक समीर पाटील यांनी या शिबिरात स्वत: रक्तदान करून नवा आदर्श घालून दिला आहे. पाटील म्हणाले की, रक्तदान हे जीवनदान आहे. सध्या सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यासाठीच वर्षभर रक्तदानाची महाचळवळच आम्ही राबविणार आहोत.