विटा : केंद्र सरकारने केलेले शेतकरीविरोधी तीन कायदे रद्द करावेत, हमीभाव मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरूवारी भिवघाट (ता. खानापूर) येथे राष्ट्रीय महामार्गावर किसान सभेतर्फे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या फलकाची होळी करुन निषेध केला.
केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन केले. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे आंदोलन सुरू आहे. किसान सभेचे जिल्हा संघटक गोपीनाथ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करीत वाहतूक रोखून धरण्यात आली. त्यानंतर मोदी सरकारचा निषेध करीत केंद्र सरकारच्या फलकाची आंदोलकांनी होळी केली.
यावेळी जिल्हा संघटक गोपीनाथ सूर्यवंशी म्हणाले, केंद्र सरकार दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन बळाचा वापर करून दडपून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र केंद्राच्या या दडपशाहीला न जुमानता लाखो शेतकरी चार दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. हे आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी भारतीय किसान सभेने पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनात जिल्हा संघटक गोपीनाथ सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष सुनील हसबे, दौलत भगत, महानंदा हसबे, जयराम जाधव, रविकांत जाधव, शिवाजी यादव, संतोष यादव, राजाराम माने आदी उपस्थित होते.
फोटो - ०३१२२०२०-विटा-किसान सभा :
शेतकरीविरोधी कायद्यांच्या निषेधार्थ भिवघाट येथे गुरुवारी किसान सभेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या फलकाची होळी केली.