लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढतो आहे. वेळेत उपचार व्हावेत यासाठी प्रशासनाने नियोजन करावे. तालुकास्तरावर उपचारांची सोय वाढविण्यासह आता आणखी रुग्णालये आरक्षित करून ठेवावीत, अशी सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी सांगलीत केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, आयुक्त नितीन कापडणीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या उपचारांस प्राधान्य देण्यात येत असले तरी अडचणी वाढत आहेत. प्रशासनाने उपाययोजनांवर भर देतानाच सर्व बाधितांना उपचार मिळेल याचे नियोजन केल्यास सुलभता येणार आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सुरू असलेल्या कडक निर्बंधांचे पालन काटेकोरपणे करण्यास प्राधान्य द्यावे. जेणेकरून बाधितांची संख्या घटण्यास मदत होणार आहे. कोविड रुग्णालयासह तालुका स्तरावरही आता उपचारांची सोय करण्यात आली असून, ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा अनावश्यक वापर टाळावा. सध्या कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी आरक्षित केलेल्या रुग्णालयांच्या संख्येतही वाढ केल्यास अजून दिलासा मिळणार असल्याने आता प्रशासनाने अजूनही काही रुग्णालये आरक्षित करावीत. रुग्णांची संख्या, उपलब्ध खाटांची संख्या याबाबतची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंत्रणेने काम केल्यास संभ्रमावस्था दूर होणार असल्याने माहिती पोहोचवावी, असेही त्यांनी सांगितले.
चौकट
लसीकरण केंद्रावरील गर्दी कमी करा : विश्वजित कदम
कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम मुंबईतून ऑनलाईन पद्धतीने बैठकीस उपस्थित होते. ते म्हणाले की, लसीकरण केंद्रावरील गर्दी कमी केल्यास संसर्गाचा धोका कमी होणार आहे. नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर नोंदणी केल्यास त्यांना संपर्क साधून लसीकरणासाठी बोलाविण्यात येईल, यासाठी नियोजन करावे.