विटा : खानापूर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत आहे. यापार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर रणधुमाळी सुरू झाली आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या निर्णयानुसार मंगळवार, दि. १५ रोजी काढण्यात येणाऱ्या सरपंच पदाच्या आरक्षणाच्या सोडतीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून, निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी सांगितले.
खानापूर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींची मुदत गेल्या सहा महिन्यांपूर्वीच संपली आहे. परंतु, कोरोनामुळे आयोगाने निवडणुकांना स्थगिती दिली आहे. आता दि. ११ डिसेंबरला आयोगाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आचारसंहिताही सुरू झाली आहे. तर दि. १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येत आहे. खानापूर तालुक्यातील देविखिंडी, मंगरूळ, तांदळगाव, मेंगाणवाडी, रेणावी, खंबाळे (भा.), शेंडगेवाडी, भडकेवाडी, पारे, माहुली, नागेवाडी, पोसेवाडी व भिकवडी बुद्रुक या १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत आहे. यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर आ. अनिल बाबर समर्थकांची सत्ता आहे. मात्र, यावेळी राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत महाविकास आघाडीचा प्रयोग कितपत यशस्वी होणार, याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
चौकट :
लक्षवेधी लढती
दि. १५ जानेवारीला होणाऱ्या खानापूर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींपैकी मंगरूळ, माहुली, नागेवाडी, रेणावी व खंबाळे (भा.) या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.