सांगली : जिल्हा पोलीस दलातील ३२७ जागांसाठी उद्यापासून (शुक्रवार) भरतीची प्रक्रिया सुरु होत आहे. ही प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी गुरुवारी सायंकाळी याचा आढावा घेतला. दररोज बाराशे उमेदवारांना परीक्षेसाठी बोलाविण्यात आले आहे. २२ जूनपर्यंत भरतीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.सांगलीतील संजयनगर, मिरजेतील गांधी चौकी व भिलवडी (ता. पलूस) येथे गृह विभागाने तीन स्वतंत्र पोलीस ठाणी मंजूर केली आहेत. या ठाण्यात स्वतंत्र स्टाफही मंजूर केला आहे. या स्टाफसह रिक्त झालेल्या ३२७ जागांसाठी भरती होत आहे. यासाठी सुमारे ७ हजार २८९ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यामध्ये ९९ महिलांच्या जागा आहेत. एक हजार १०२ महिला उमेदवार भरतीसाठी येणार आहेत. सांगलीसह बाहेरच्या जिल्ह्यातील उमेदवारांनीही अर्ज केले आहेत. उद्यापासून (शुक्रवार) पहाटे पाच वाजता भरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे. भरती शांततेत पार पडावी, यासाठी ४० अधिकारी व ३०० पोलीस कर्मचार्यांचा बंदोबस्त तैनात केला आहे. भरतीचे चित्रीकरण करण्यासाठी मुख्यालयाच्या मैदानावर २५ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पुरुषांच्या भरतीसाठी शंभर मीटर धावणे, लांबउडी, गोळाफेक या शारीरिक चाचण्या, तर महिलांसाठी धावणे, लांबउडी अशा चाचण्या घेण्यात येणार आहेत. त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पुरुष उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच महिलांना एकाचदिवशी बोलाविले जाणार आहे. पाऊस झाल्यास एखाद्यादिवशी भरती रद्द केली जाणार आहे. आॅनलाईन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ज्या क्रमांकाने अर्ज आले आहेत, त्यानुसार दररोज बाराशे उमेदवारांना बोलाविले जाणार आहे. यामुळे गर्दी व गोंधळ होणार नाही. पहिल्यांदा उंची व छातीची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांची कागदपत्रे पाहिली जाणार आहेत. कागदपत्रे योग्य असतील तरच प्रवेश दिला जाईल, असे पोलीसप्रमुख सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आजपासून पोलीस भरती
By admin | Updated: June 6, 2014 00:30 IST