सांगली शहर व परिसरात सोमवारी सकाळपासून ऊन-पावसाचा खेळ रंगला होता. दुसरीकडे धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोरही अत्यंत कमी झाला आहे. धरणातील विसर्ग सुरू असला तरी त्याचा नदीपातळीवरील परिणाम कमी आहे. सोमवारी सकाळी नोंदलेल्या आकडेवारीनुसार सांगलीतील आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी ११ फूट इतकी होती. येत्या दोन दिवसांत ती आणखी कमी होण्याची चिन्हे आहेत.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या २५ जूनपर्यंत पावसाचा जोर कमीच राहणार आहेत. काही ठिकाणी तुरळक सरी, शिडकावा होण्याची शक्यता आहे.
चौकट
तापमानात पुन्हा वाढ
जिल्ह्यात मागील आठवड्यात सलग चार दिवस पडलेल्या पावसामुळे तापमानात घट झाली होती. आता तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. मंगळवारी कमाल तापमान ३१, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. कमाल तापमानात आणखी दोन अंशाने वाढ होण्याचा अंदाज आहे.