इस्लामपूर : वाळवा येथे कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. गावातील अंदाजे ३०० ते ४०० कुटुंबांना शासनाच्या मदतीपासून वंचित ठेवून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. हा अन्याय न करता गावातील प्रत्येक पूरग्रस्ताला सरसकट तातडीची मदत द्यावी, अशी मागणी महाडिक युवा शक्तीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या मागणीचे निवेदन सनी अहिर, आकाश अहिर, शुभम तोडकर, अक्षय पाटील, निरंकार बंडे यांनी नायब तहसीलदार सीमा सोनवणे यांना दिले. या निवेदनात गावातील हाळभाग, कोटभाग, पेठ यासह इतर परिसरातील पूरग्रस्तांना शासनाची तातडीची मदत सरसकट द्यावी. तसेच ३०० ते ४०० कुटुंबांना या मदतीपासून वंचित ठेवले जाण्याची भीती आहे. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. पूरग्रस्तांना मदत मिळण्यास विलंब होत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी बाळासाहेब मगदूम, नितीन पाटील, प्रकाश कोकाटे, विलास मोहिते, अनिल थोरात, दत्तात्रय देशपांडे, अजित होरे उपस्थित होते.