फोटो ओळ :
कुंडल (ता. पलूस) येथे क्रांती साखर कारखान्यावर आयोजित कार्यक्रमात विलास जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शरद लाड उपस्थित होते.
--
कुंडल : मागील काही वर्षात हवामानाच्या सर्व घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. जमिनीतील घटत चाललेले सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे भविष्यात शेतीसाठी धोकादायक असून, शेतकऱ्यांनी याबाबत वेळीच जागरूक होणे आवश्यक आहे, असे मत क्रांती साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी विलास जाधव यांनी व्यक्त केले.
कुंडल (ता. पलूस) येथे कारखाना कार्यस्थळावर आयोजित शेतकारी चर्चासत्रात ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य शरद लाड अध्यक्षस्थानी होते.
विलास जाधव म्हणाले, जमीन हे पीक वाढीचे माध्यम आहे, तर सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा आत्मा आहे. सेंद्रिय कर्बामुळे जमिनीची भौतिक, जैविक व रासायनिक सुपीकता टिकून राहते व वाढते. सेंद्रिय कर्ब व्यवस्थापनासाठी कारखान्यामार्फत ५० टक्के अनुदानावर ताग व ध्येंचा बियाणे पुरवठा, कंपोस्ट खत, गांडूळ खत, सेंद्रिय खत पुरवठा अशा अनेक योजना राबविल्या जात आहेत. उसाचे पाचट शेतीमध्ये ठेवण्यासाठी कारखान्यामार्फत सातत्याने पाचट अभियान राबविले जात आहे. शेतकऱ्यांनी आपली जबाबदारी म्हणून जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रवीण जाधव, आनंदा भाट यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे, सेक्रेटरी आप्पासाहेब कोरे, वसंत लाड, महारूद्र जंगम, दत्ताजीराव मोहिते, संजय जाधव, अरुण पाटील, सदाशिव पाटील, लहू पाटील, अधिक लाड आदी उपस्थित होते.