गोटखिंडी : गोटखिंडी, ता. वाळवा ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल बारा लाख ७०० रुपये थकीत आहे. याप्रकरणी महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केल्यामुळे गावाचा पाणीपुरवठा बंद झाला आहे.
ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाची बारा लाख ७०० रुपयांची थकबाकी असल्याने महावितरणकडून वीजपुरवठा खंडित आहे. पाणीपट्टी वसूल होत नसल्यामुळे ग्रामपंचायत महावितरणची थकबाकी भरू शकली नाही. यामुळेच महावितरणने ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. यामुळे ग्रामस्थांना ऐनपावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाच्या माहितीनुसार पाणीपट्टी वसुलीसाठी कर्मचाऱ्यांची संख्या अपूर्ण आहे. यामुळे पाणी वसुलीला अडचणी येत आहेत. याबाबत ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि सदस्यांनी थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पाणीपट्टीचे पैसे नियमित भरणाऱ्या नागरिकांना वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे पाणी मिळत नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. याकडेही लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.