लोकमत न्यूज नेटवर्क
जत : जत-सांगली मार्गावरील नगरपरिषदेच्या जलशुध्दीकरण केंद्राजवळ असलेल्या जत नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची दुरवस्था झाली आहे. विद्युत यंत्रणा, झाडांची कत्तल, लहान मुलांची खेळणी, तुटलेले बाके, उद्यानाच्या फलकाची दुर्दशा झाली आहे. याबाबत नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जत नगरपरिषदेने जत ते सांगली मार्गावरील जागेवर लाखो रुपये खर्च करून चांगल्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची उभारणी केली होती.
उद्यानात नगरपरिषदेने विविध प्रकारची शोभिवंत अशी झाडे लावली होती. या झाडांना संरक्षण म्हणून उद्यानासभोवती लोखंडी खांब उभे करून तारेचे कंपाउंडही घातले होते. जत येथील काही दानशूर व्यक्तींनी उद्यानात अबालवृद्धांना बसण्यासाठी सिमेंट बाकडी भेट दिली होती. लहान मुलांसाठी खेळणीही उपलब्ध करून दिली होती.
सध्या उद्यानाकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष झाल्याने उद्यानाची दुर्दशा झाली आहे. उद्यानासभोवती असलेले तारेचे कंपाउंड नाहीसे होत चालले आहे. उद्यानातील लहान मुलांची खेळणी मोडकळीस आली आहेत. काही ठिकाणची खेळणी गंजून चालली आहेत. दानशूर व्यक्तीनी जत नगरपरिषदेस भेट म्हणून दिलेली सिमेंटची बाके फुटली आहेत.
उद्यानातील विद्युत यंत्रणा बंद आहे. उद्यानातील रात्रीच्या वेळी लाइटची व्यवस्था नसल्यामुळे अबालवृद्धांची गैरसोय होत आहे. कंपाउंड नसल्याने उद्यानातील झाडांची कत्तल झाली आहे.
उद्यानाच्या सकृतदर्शनी भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची फलकाचीही दुर्दशा झाली आहे. नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे उद्यानाची बकाल अवस्था झाली आहे.
नगरपरिषद नगरोत्थान योजनेतून शहरातील विद्यानगर, मोरे काॅलनी आदी ठिकाणी नवीन उद्यानाची उभारणी करण्यासाठी लाखो रुपये खर्च करत असताना दुसरीकडे मात्र पूर्वीच्या उभारण्यात आलेल्या उद्यानाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे.
नगरपरिषदेने छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची त्वरित दुरुस्ती करावी. उद्यानाला पूर्वीचे स्वरूप प्राप्त करून द्यावे, अशी मागणी अबालवृद्धांकडून करण्यात येत आहे.