अशोक पाटील ल्ल इस्लामपूर मराठवाड्याचे नेते आणि केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे सोमवारी दिल्लीत अपघाती निधन झाले. मुंडे यांच्या निधनामुळे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व सध्या काँग्रेसमध्ये असलेले सी. बी. पाटील, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य बाबासाहेब सूर्यवंशी, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमभाऊ पाटील आणि राहुल महाडिक यांना राजकीय मोठा धक्का बसला आहे. मुंडेंच्या संपर्कातील या नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे. गोपीनाथ मुंडे यांचा सांगली जिल्ह्याशी जवळचा संपर्क होता. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आणि मुंडे यांनी भाजपमध्ये एकत्रित काम केले आहे. डांगे हे सध्या राष्ट्रवादीमध्ये असले, तरी तेही या घटनेमुळे अस्वस्थ आहेत. सी. बी. पाटील यांच्याकडे मुंडे यांनीच सांगली जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. तेव्हापासून मुंडे यांच्याशी त्यांचा राजकीय सलोखा होता. त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला, तरी त्यांचे आणि मुंडे यांचे मैत्रीचे संबंध होते. मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्याचे भाजपचे माजी अध्यक्ष व विद्यमान राज्य कार्यकारिणी सदस्य बाबासाहेब सूर्यवंशी यांनी वाळवा तालुक्यात भाजप भक्कम करण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यांनी आज अखेर भाजपचा झेंडा फडकवत ठेवला आहे. त्यामुळे त्यांनाही मुंडेच्या अचानक एक्झिटमुळे मोठा धक्का बसला आहे. अशोकदादा पाटील आणि त्यांचे पुत्र विक्रमभाऊ पाटील या दोघांनीही अण्णासाहेब डांगे यांच्या नेतृत्वाखाली वाळवा तालुक्यात भाजप वाढीसाठी प्रयत्न केले होते. परंतु अशोक पाटील हे राष्ट्रवादीत जाऊन नगराध्यक्ष झाले. त्याचवेळी आनंदराव मलगुंडेही भाजपमध्ये होते. त्यानंतर विक्रमभाऊ पाटील यांनी वाळवा तालुक्यातील ग्रामीण भागात भाजपचे जाळे भक्कम करण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीपूर्वी गोपीनाथ मुंडे यांना इस्लामपुरात बोलवून भाजप कार्यकर्त्यांना रिचार्जही केले होते. गोपीनाथ मुंडे हीच त्यांची ताकद होती, त्यामुळे भविष्यातील त्यांचे राजकीय मनसुबे ढासळले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशामुळे वाळवा तालुक्यातील भाजप नेत्यांमध्ये नवचैतन्य आले होते. बाबासाहेब सूर्यवंशी, विक्रमभाऊ पाटील हे दोघेही विधानसभेच्या तयारीला लागले होते. मुंडे यांचा नागरी सत्कार करण्याचे नियोजनही विक्रम पाटील यांनी केले होते. सत्काराची तारीख ठरविण्यासाठी पाटील परळीला गेले होते. परंतु मुंडे यांच्या अपघाती निधनाने त्यांना फार मोठा धक्का बसला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात विरोधी पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू होती. यातच काँग्रेसचे माजी जि. प. सदस्य राहुल महाडिक हे भाजपच्या संपर्कात होते. ते अलीकडील काळात मुंडेंच्याही संपर्कात आले होते. मुंडे यांनी इस्लामपूर मतदारसंघाला भाजपची उमेदवारी देण्याविषयीही आश्वासन दिले होते, परंतु त्यांच्या अपघाती निधनाने महाडिक गटातही अस्वस्थता पसरली आहे.
वाळवा तालुक्यातील राजकीय नेते अस्वस्थ
By admin | Updated: June 5, 2014 00:22 IST