फोटो ओळ : कडेगाव येथे सागरेश्वर सूतगिरणी कार्यस्थळावर प्रांताधिकारी आयुषी सिंह यांनी पुनर्वसित ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी अध्यक्ष शांताराम कदम, महेश कदम, संभाजी मुळीक उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसित गावठाणमध्ये भोगवटदार वर्ग दोनचे वाटप झालेले भूखंड वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्यात येत आहेत. कडेगाव तालुक्यात बहुतांशी सर्व पुनर्वसित गावात ही प्रक्रिया बाकी आहे. यामुळे संबधित भूखंडधारकांनी आपले भूखंड वर्ग एक करून घ्यावेत, असे आवाहन कडेगावच्या प्रांताधिकारी आयुषी सिंह यांनी केले.
कडेगावच्या नूतन प्रांताधिकारी आयुषी सिंह यांनी कडेगाव येथील सागरेश्वर सहकारी सूत गिरणीला भेट दिली. यावेळी सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांनी तालुक्यातील मेंढगाव, वांग रेठरे, वाजेगाव, घोटील, नांदनी नगर, उमर कांचन, केकताई नगर या पुनर्वसित गावातील लोकांचे प्रश्न मांडले. यावेळी संबंधित गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
आयुषी सिंह म्हणाल्या, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करताना पुनर्वसित गावठाणमध्ये घर बांधण्यासाठी त्यांनी यापूर्वी धारण केलेल्या जमिनीच्या भोगवटा स्थितीसह भूखंड मंजूर करण्यात येतो. पाटबंधारे प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या कुटुंबांना पुनर्वसित झालेल्या गावठाणमध्ये भोगवाटदार वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्याचा शासन निर्णय आहे. ही प्रक्रिया सुरू असून, अत्यंत अल्प मोबदल्यात प्रकल्पग्रस्तांना त्यांचे भूखंड वर्ग एक करून देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी आपले अर्ज द्यावेत, त्यावर तत्काळ कार्यवाही होईल, असे सिंह यांनी सांगितले.
शांताराम कदम म्हणाले, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम हे पुनर्वसित गावातील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मूलभूत सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहेत. यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे उपाध्यक्ष महेश कदम व संभाजी मुळीक उपस्थित होते.