सांगली : माधवनगर येथील ज्वेलरी दुकानातून चोरट्यांनी १५ तोळ्यांचे सोने आणि चांदीचे दागिने असा सुमारे साडेआठ लाखांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणातील संशयित पोलिसांच्या रडारवर असून लवकरच त्यांना ताब्यात घेण्यात येणार आहे. पन्नासहून अधिक जणांची चाैकशी केल्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे चोरीचा छडा लावण्यात येत आहे.
माधवनगरमधील बुधवार पेठेत दत्ताजी साळुंखे यांचे सागर ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. रविवारी (दि. ७) सकाळी साडेनऊच्या सुमारास साळुंखे हे दुकान उघडण्यासाठी घरातून १५ तोळ्यांच्या सोन्याच्या आणि चांदीच्या दागिन्यांची बॅग घेऊन आले होते. त्यांनी दुकान उघडल्यानंतर काऊंटरच्या आतील बाजूस ती बॅग ठेवली होती. संशयित दोघे चोरटे तिथे आले व त्यांनी तुमचे पैसे दुकानाबाहेर पडले असल्याचे सांगितले. साळुंखे हे पैसे घेण्यासाठी दुकानाबाहेर गेले असतानाच त्यांची काऊंटरवर ठेवलेली बॅग घेऊन संशयित पसार झाले होते.