लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वाळवा-शिराळा मतदारसंघात शेतकरी संघटनेचे दिग्गज नेते आता विविध पक्षांचे टेकू घेऊन लढत आहेत. माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीशी सलगी केली आहे, तर रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी भाजपशी घरोबा करून त्यांच्याच ताकदीवर किसान आत्मनिर्भर यात्रेचा प्रारंभ केला आहे. या दोन्ही शेतकरी नेत्यांना स्वत:च्या अस्तित्वासाठी लढावे लागत आहे. परंतु या लढाईत त्यांच्या स्वत:च्या कार्यकर्त्यांची वानवा आहे.
मागील युती शासनाच्या काळात पुणतांबा (जि. अहमदनगर) येथे शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचा श्रेयवाद पेटला होता. त्यातून तत्कालीन मंत्री सदाभाऊ खोत आणि तत्कालीन खासदार राजू शेट्टी हे नेते बॅकफूटवर गेले होते. यातूनच सावरण्यासाठी शेट्टी यांनी राज्यात आत्मक्लेष यात्रा काढून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पुन्हा बळकट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीशी सलगी करून अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्न केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आलेली उभारी पाहून रयत क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी वाळवा तालुक्यातून आता किसान आत्मनिर्भर यात्रेची सुरुवात केली. या यात्रेत भारतीय जनता किसान मोर्चा आणि भाजपच्या नेत्यांचे सहकार्य घेऊन त्यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनाच लक्ष्य केले, बॅकफूटवर पडलेली रयत क्रांती संघटना आक्रमक झाल्याचे दाखवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला शह देण्याचा डाव यामागे आहे. हे दोन्ही नेते आता विविध पक्षांचा टेकू घेऊनच अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
चाैकट
उभारीचा प्रयत्न
केंद्र शासनाच्या कृषी विधेयकाविरोधात सध्या दिल्लीत आंदोलन सुरू आहे. आंदोलनामागे राष्ट्रवादीचे नेते असल्याचे बोलले जात आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेट्टी यांनी मोजक्याच कार्यकर्त्यांचा ताफा नेला होता. तेथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. यातून राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पुन्हा उभारी आल्याचे दिसले.
फोटो - राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांचा फोटा घ्यावा.