ते म्हणाले की, भाजपशी संबंधित असलेला अभिनेता दीप सिद्धू व संयुक्त किसान मोर्चाचा भाग नसलेल्या व गडबड घडवून आणण्यासाठीच आंदोलनात उतरविण्यात आलेल्या किसान मजदूर संघर्ष कमिटीला हाताशी धरून भाजपच्या केंद्र सरकारने प्रजासत्ताकदिनी दिल्लीत हिंसाचार घडवून आणला. लाल किल्ल्यावरही आक्षेपार्ह कृत्य केले. दुसऱ्या बाजूला संयुक्त किसान मोर्चाने प्रजासत्ताकदिनी अत्यंत शांततेत अभूतपूर्व ट्रॅक्टर मार्च काढला. एक लाख ट्रॅक्टर व सात लाख शेतकरी सहभागी झाले. भाजपच्या आय टी सेलने मात्र याकडे देशवासीयांचे लक्ष जाऊ नये यासाठी दिल्ली येथे दीप सिद्धू, किसान मजदूर संघर्ष कमिटी आणि पोलीस यांनी घडविलेला हिंसाचार चित्रित करून तो देशभर प्रसारित केला. शेतकऱ्यांचे दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरू असलेले शांततामय आंदोलन पहिल्यांदा बदनाम करायचे व नंतर बळाचा वापर करून ते मोडून काढायचे या षडयंत्राचा भाग म्हणून हे सारे करण्यात आले.
संयुक्त किसान मोर्चा, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती आणि अखिल भारतीय किसान सभा सरकारच्या कृतीचा धिक्कार करत आहे. महात्मा गांधी यांच्या हौतात्म्य दिनी दि. ३० जानेवारी रोजी देशभर एक दिवसाचा उपवास करून निषेध करणार आहेत, असे ते म्हणाले.