सांगली : महापालिकेत विरोधी पक्ष आहे का? असा सवाल दरवेळी विचारला जातो. सत्तेत कोणीही असो, विरोधकांचे बळ नेहमीच कमी झाले आहे. सत्तेच्या राजकारणात विरोधी पक्षांची वाताहत ठरलेली असते. त्याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. सत्ताधारी काँग्रेसने मागासवर्गीय समितीच्या सभापती पदासाठी स्वाभिमानी आघाडीच्या बाळू गोंधळींना उमेदवारी देऊन पूर्वीचा पैरा फेडला. आता जिल्हा बँकेनंतर निर्माण झालेल्या नव्या समीकरणात भविष्यात राष्ट्रवादीच्या वाट्यालाही विषय समित्यांचे सभापतीपद मिळाल्यास आश्चर्य वाटू नये. महापालिकेच्या स्थापनेपासूनच विरोधकांची कमतरता नेहमीच जाणवली आहे. किशोर जामदार महापौर झाल्यानंतर विरोधकांचे अस्तित्वच संपुष्टात आले. सत्ताधारीच विरोधक म्हणून काम करू लागले, तर विरोधी पक्षातील नगरसेवक जामदारांच्या इशाऱ्यावर चालत होते. विकास महाआघाडी सत्तेत आल्यानंतरही हा प्रकार सुरू राहिला. इद्रिस नायकवडींच्या काळात विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्ष सत्तेत गेला, तर सत्ताधारी राष्ट्रवादीचे नगरसेवक विरोधक म्हणून काम करू लागले. आता पालिकेत काँग्रेसकडे पूर्ण बहुमत आहे. तरीही त्यांना विरोधी पक्षांच्या मतांची गरज भासते. त्यासाठी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महापौर निवडीवेळी स्वाभिमानी आघाडीला साकडे घालण्यात आले. बहुमत सिद्ध करण्याच्या नादात विरोधकांचे उंबरठे झिजविले गेले. त्यातून स्वाभिमानी आघाडीला सभापती पदाचा शब्द देण्यात आला, अशी चर्चा होती. आता ती खरी ठरली आहे. मागासवर्गीय समितीच्या सभापती पदासाठी काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या अधिक असतानाही स्वाभिमानी आघाडीला संधी देण्यात आली. बाळू गोंधळी यांचा अर्ज काँग्रेसकडून भरण्यात आला. महापौर व प्रभाग समितीमध्ये स्वाभिमानीने केलेला पैरा यानिमित्ताने काँग्रेसने फेडला. विरोधी राष्ट्रवादी व स्वाभिमानी एकत्र आले, तर दोन प्रभाग समित्यांवर वर्चस्व राखू शकतात. शिवाय स्थायी समितीत काँग्रेसच्या नाराज गटाला सोबत घेतल्यास काँग्रेसच्या वर्चस्वाला शह देऊ शकतात. पण पालिकेच्या राजकारणात तरबेज असलेल्या काँग्रेस नेत्यांपुढे विरोधकांचे कितपत चालते, हे पाहणेही रंजक असेल. त्यामुळेच राष्ट्रवादीला पदाची संधी असल्याची चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी) राजकारणाला कलाटणी जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून जिल्ह्यातील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आ. जयंत पाटील व माजी मंत्री मदन पाटील एकत्र आले होते. तेव्हा पालिकेच्या राजकारणातही काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येणार का? अशी चर्चा रंगली होती. सध्या तरी दोघांनी सवतासुभा मांडला आहे. येत्या आॅगस्टमध्ये स्थायी समिती व प्रभाग समिती सभापतींच्या निवडी होणार आहेत.
महापालिकेत काँग्रेस-स्वाभिमानीचा पैरा
By admin | Updated: June 15, 2015 00:19 IST