अविनाश कोळी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अतिघाई मृत्यूला निमंत्रण देई...असे फलक पाहूनही त्याकडे कानाडोळा करीत सुसाट सुटलेल्या राज्यातील तब्बल ८ हजार लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये अशा अतिघाईने बळी गेलेल्यांची संख्या जवळपास दुपटीने वाढली आहे. यामध्येही हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांची संख्याही अधिक आहे.
राज्यातील अपघातात बळी गेलेल्यांची संख्या ही देशात सर्वाधिक आहे. बेशिस्तपणा व बेफिकीरी ही दोन ठळक कारणे यामागे आहेत. वाहतुकीचे नियम तोडल्याने २०१९ मध्ये १२ हजार ७८८ लोकांचे बळी गेले. त्यात जवळपास ४१ टक्के बळी हेे अतिवेगात वाहन चालविल्यामुळे गेले आहेत. दारू पिऊन वाहन चालविणे, चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, सिग्नल मोडणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे यासह अन्य नियम मोडल्याने दरवर्षी हजारो जीव जात आहेत. अशा नियमांच्या उल्लंघनाच्या व त्यातून अपघाताच्या घटनाही दरवर्षी वाढत आहेत.
चौकट
नियम मोडल्याचे परिणाम (२०१९)
उल्लंघनाचा प्रकार मृत्यू गंभीर इजा
अतिवेग ८१७५ ११,९४७
ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह ५३ १२८
चुकीच्या दिशेने वाहन चालविणे १५४ ३८८
मोबाईल वापर १३ ६७
सिग्नल तोडणे ४ ३५
अन्य कारणे ४३८९ ६५८७
चौकट
नियमभंगामुळे अपघाताचे तुलनात्मक आकडे
२०१८
प्रकार मृत्यू गंभीर इजा
अतिवेग ३९२९ ५६२३
अन्य नियमांचे उल्लंघन ४९७ ८५०
२०१९
प्रकार मृत्यू गंभीर इजा
अतिवेग ८१७५ ११९४७
अन्य नियमांचे उल्लंघन ४६१३ ७२०५
चौकट
दुचाकीस्वारांना धोका अधिक
राज्यातील वाहन प्रकारानुसार अपघातांच्या एकूण आकडेवारीचा विचार केल्यास, सर्वाधिक म्हणजेच ४० टक्के अपघातग्रस्त दुचाकीस्वार आहेत. दुचाकीचे एकूण १३ हजार ३३० अपघात झाले असून, त्यात ५८९४ दुचाकीस्वारांचा बळी गेला आहे.
चौकट
निष्पाप पादचारी बळी
दुचाकी व अन्य वाहनांच्या चुकीमुळे निष्पाप २८४९ पादचाऱ्यांचे बळी गेल्याची, तर ३ हजार ७७४ पादचाऱ्यांना गंभीर दुखापत झाल्याची नोंद २०१९ मध्ये झाली.