इस्लामपूर : कापूसखेड (ता. वाळवा) येथे शेतात पाणी सोडत असल्याच्या कारणातून सातजणांनी संगनमत करीत एकास काठीने जबर मारहाण करीत गंभीर जखमी केल्याची घटना घडली. हा प्रकार सोमवारी सायंकाळी नेर्ले रस्त्यावर झाला.
याबाबत अरुण बाबूराव पाटील (वय ४५) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार संताजी यशवंत पाटील, प्रवीण प्रकाश पाटील, ओम अधिक पाटील, बाबू अधिक पाटील, शुभम संताजी पाटील, अधिक भीमराव पाटील आणि सूरज संताजी पाटील अशा सातजणांविरुद्ध गंभीर दुखापत करून मारहाण केल्याचा गुन्हा पोलिसांनी नोंद केला आहे.
वरील हल्लेखोरांनी संगनमत करीत अरुण पाटील यांना तू आमच्या शेतात पाणी का सोडतोस, त्यामुळे शेतात ट्रॅक्टर अडकून पडला आहे. शेताचे नुकसान झाले आहे असे म्हणत काहींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी इतरांनी काठीने मारहाण केली. यामध्ये अरुण पाटील यांच्या हाताचे बोट मोडले आहे. हवालदार स्वामी अधिक तपास करीत आहेत.