ओळी -
शहरातील खणभाग परिसरात महापालिकेच्या वतीने नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले. यावेळी नगरसेविका स्वाती शिंदे, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, सागर घोडके उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील मध्यवर्ती खणभाग परिसरात ५० ते ६० वर्षांपूर्वी जलवाहिन्या टाकल्या होत्या. आता या वाहिन्या जीर्ण झाल्याने खणभाग परिसराला अपुरा व दूषित पाण्याचा पुरवठा होतो. जलवाहिन्या बदलण्याची मागणी नागरिकांतून होत होती. त्यासाठी भाजपच्या नगरसेविका स्वाती शिंदे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. अखेर शनिवारी जलवाहिन्या बदलण्याच्या कामाला सुरुवात झाली.
शहरातील खणभागचा परिसर गावठाणात येतो. या परिसरातील जलवाहिन्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागली आहे. तसेच त्या जीर्ण झाल्याने त्यात गटारीचे दूषित पाणीही मिसळत असते. जुन्या जलवाहिन्या बदलून नवीन टाकण्याची मागणी नागरिकांतून होत होती. ॲड. शिंदे यांनी त्यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे पाठपुरावा केला. आयुक्तांनी टप्प्याटप्प्याने खणभागातील जलवाहिन्या बदलण्यास मंजुरी दिली. शनिवारी पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात करण्यात आली. माजी नगराध्यक्ष रामभाऊ घोडके यांच्या हस्ते नगरसेविका ॲड. स्वाती शिंदे, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेविका सुनंदा राऊत, नगरसेवक सागर घोडके, सुजीत राऊत, आशिष साळुंखे, तौफीक शिकलगार, गजानन मोरे, भाजपा महिला आघाडीच्या वंदना जाधव, अर्चना जाधव, आशा खामकर, पद्मा मुळिक, सुनीता शिंगटे यांच्यासह भागातील नागरिकांच्या उपस्थितीत कामाला सुरुवात झाली.