सांगली : मान्सून पावसाच्या सरींमुळे जिल्ह्यातील टँकरची संख्या सहाने घटली आहे. टँकरची संख्या आता तीसवरुन वीसवर आली आहे. दरम्यान, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेवरील मजुरांची संख्या मात्र अकरा हजारांवर गेली आहे. गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यातील जत, आटपाडी, खानापूर, शिराळा व मिरज तालुक्यात तीस टँकर सुरू करण्यात आले होते. यामधील जत, आटपाडी, खानापूर व शिराळा तालुक्यातील सहा टँकर कमी करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखाली ८४६ कामे सुरु असून, यावर ११ हजार ५१९ मजूर काम करीत असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिली. त्याचबरोबर शासकीय यंत्रणेकडील १०६ कामावर ८६५ मजूर काम करीत आहेत. सर्वाधिक कामे आटपाडी तालुक्यात सुरु असून, येथे २२५ कामे सुरु आहेत. तालुकानिहाय कामांची संख्या कंसात मजुरांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. आटपाडी २२५ (३२०७), जत १९६ (३३९७), कडेगाव ४२ (४१९), कवठेमहांकाळ २४ (३०७), खानापूर ६२ (७४७), मिरज ३१ (२९५), पलूस ६६ (११४१), शिराळा ४५ (१९९), तासगाव ८२ (८७३), वाळवा ७३ ( ९३५) अशी कामे सुरु आहेत. मागणीच्या ठिकाणी तात्काळ कामे सुरू करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात टँकरची संख्या घटली
By admin | Updated: June 23, 2014 00:51 IST