सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने दिलासा मिळत आहे. यामुळे घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्याही कमी झाली आहे. सध्या ३२९९ जण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. महिनाभरापूर्वी ८ हजारांहून अधिक रुग्ण उपचार घेत होते. कोविड सेंटरमधील रुग्णसंख्याही कमी होत आहे.
--------
आठवडी बाजारामुळे वर्दळ
सांगली : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर आठवडी बाजार सुरू झाल्याने शहरातील प्रमुख उपनगरातील नागरिकांची वर्दळ वाढली आहे. आठवडी बाजारावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने कोरोना संसर्गाचा धोका असलातरी शेतकरी, व्यापाऱ्यांना मात्र, यामुळे रोजगार मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. महापालिकेकडून गर्दी कमी करण्यासाठी आवाहन करण्यात येत असलेतरी गर्दी मात्र, कायम आहे. -------
नेत्रदान चळवळीस प्राधान्य द्या
सांगली : दरवर्षी २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरपर्यंत नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात येतो. नेत्रदान व नेत्रसंकलन होत असलेतरी तुलनेत रुग्णांकडून मागणी अधिक आहे. नेत्रदानाची चळवळ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यामुळे या चळवळीस प्राधान्य देण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले.
------
पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात
सांगली : गेल्या महिन्यात महापुरामुळे शेतीसह अन्य घटकांच्या झालेल्या नुकसानीचे सध्या पंचनामे सुरू आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिलेल्या आदेशानुसार आता पंचनाम्याच्या कामांनी गती घेतली आहे. त्यानुसार या आठवड्यात पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने काम सुरू आहे.