दत्ता पाटील- तासगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील वर्चस्ववादाचे कवित्व भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून संपलेले नाही. मात्र तालुक्यातील जनतेचा खरा कौलच नेत्यांना समजला नाही की काय? असाच प्रश्न चढाओढीच्या राजकारणाने उपस्थित झाला आहे. तालुक्याला विधानसभेसोबतच लोकसभेत प्रतिनिधीत्व करण्याची पहिल्यांदा संधी मिळालेली आहे. आमदार सुमनताई पाटील आणि खासदार संजयकाका पाटील या दोन्ही नेत्यांनी वर्चस्वाच्या अट्टाहासाऐवजी विकास कामांचा अट्टाहास धरावा, अशीच जनतेची अपेक्षा आहे.तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका यावेळी गावपातळीवर गाजण्याऐवजी तालुका पातळीवरच जास्त चर्चेत आल्या. भाजपचे खासदार संजयकाका पाटील आणि राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्या, तालुक्यावर वर्चस्व मिळविण्याच्या महत्त्वाकांक्षेमुळे या निवडणुकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. सरपंच निवडीनंतरही वर्चस्ववादाचे राजकारण रंगतच राहिले. वर्चस्वाच्या अट्टाहासापोटी निवडून आलेल्या कारभाऱ्यांना आपल्याच पक्षाच्या व्यासपीठावर आणण्यासाठीही दोन्ही नेत्यांकडून जोराचे प्रयत्न झाले. अगदी सरपंचांना घेऊन फोटोसेशन आणि नंतर प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून पुन्हा वर्चस्वाची डरकाळी फोडण्यात आली. मात्र हे करताना विजयी उमेदवारांची अपेक्षा, उमेदवारांना विजयी करणाऱ्या जनतेच्या अपेक्षांची कोठेच दखल घेण्यात आली नाही. गावपातळीवर विजय मिळविलेल्या कारभाऱ्यांचे पुढील पाच वर्षातील विकासाचे व्हिजन काय आहे, याची साधी चर्चाही कोठे झाली नाही. हा याचा अन् तो त्याचा, एवढीच चर्चा झाली.यावेळच्या निवडणुकीत वर्चस्व कोणाचेही असले तरी, तब्बल १६ गावांतील विद्यमान कारभाऱ्यांना जनतेने नाकारले होते. त्यामध्ये राष्ट्रवादीसह भाजपच्याही ग्रामपंचायतींचा समावेश होता. जनतेला एकाच नेत्याचे वर्चस्व हवे असते, तर दोन्ही नेत्यांसाठी बालेकिल्ला असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले नसते. जनतेला विकास हवा आहे. नव्या सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे आव्हान आहे. तालुक्यातच आमदार आणि तालुक्यातीलच खासदार असल्यामुळे दोन्ही नेत्यांकडून विकासासाठी मोठा निधी येईल, अशी जनतेला अपेक्षा आहे. दोन्ही नेत्यांनी विकासासाठी ईर्षा करावी. खासदार आणि आमदारांनी गटबाजीचा अट्टाहास करण्याऐवजी विकासाचा अट्टाहास करावा, एवढी साधी अपेक्षा जनतेची आहे. ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नेते आग्रह धरणार, की गटबाजीचे राजकारण करीत राहणार, हे काळच ठरवले.आम्हीच का निष्ठा ठेवायची?तालुक्यात सध्या भाजप आणि राष्ट्रवादीत जोराचा संघर्ष सुरु आहे. दोन्ही गटात अभेद्य भिंंत तयार झाली आहे. मात्र दोन्हीकडे समान अंतर ठेवून राहणाराही एक गट आहे. अशा भिंंतीवर असणाऱ्या कारभाऱ्यांना खेचण्यासाठी दबाव येत आहे. तरीदेखील दोन्ही नेत्यांनी दावा केलेल्या बहुतांश गावांतील सदस्यांनी नरोवा कुंजरोवाची भूमिका घेतली. काही वर्षापूर्वी आबा आणि काका एक झाले होते. आम्ही एकाच नेत्याच्या मागे का राहायचे? असा प्रश्नच काही सरपंचांनी उपस्थित केला. विकासासाठी आम्हाला दोन्ही नेते हवेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.जनता वेठीस कशासाठी? लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील जनतेने संजयकाका पाटील यांना उच्चांकी मतदान केले होते. विधानसभा निवडणुकीत आर. आर. पाटील यांनाही जनतेने उच्चांकी मतदान दिले होते. दोन्ही नेत्यांना उच्चांकी मताने विजयी करणारी जनता एकच आहे. जनतेची ही भावना नेत्यांना केव्हा समजणार? की स्वार्थासाठी जनतेला वेठीस धरत राहणार? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
अट्टाहास वर्चस्वाचा नव्हे, विकासाचा हवा
By admin | Updated: November 23, 2015 00:32 IST