सांगली : जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींसाठी होत असलेल्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्यादिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. यात ९ ग्रामपंचायती बिनविराेध होण्यास यशस्वी झाल्या आहेत. इतर उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक लागली आहे.
सोमवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्यादिवशी जिल्ह्यात ग्रामपंचायतींसह काही जागाही बिनविरोध झाल्या आहेत. त्यानुसार तासगाव तालुक्यातील लोकरेवाडी, नरसेवाडी व कौलगे, आटपाडी तालुक्यात पात्रेवाडी, तांदळगाव, भडकेवाडी (ता. खानापूर), मोघमवाडी (ता. कवठेमहांकाळ), जत तालुक्यातील लमाणतांडा (उटगी) आणि टोणेवाडी बिनविरोध झाल्या आहेत.
खानापूर तालुक्यात पारे येथे ११ पैकी ७ जागा बिनविरोध झाल्या आहेत. मसुचीवाडी (ता. वाळवा) येथे ११ पैकी ९ जागा बिनविरोध झाल्या, तर तिकोंडी (ता. जत) येथील ११ पैकी आठ जागा बिनविरोध झाल्या आहेत.