अशोक पाटील - इस्लामपूर पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीला फुटीचे ग्रहण लागले असून, आगामी पालिका निवडणुकीपर्यंत माजी ग्रामविकासमंत्री आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालीच दोन गट पडणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.नगरपालिकेतील एम. डी. पवार यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी सुरुवातीला पाटील पार्टी आणि नंतर नागरिक संघटनेच्या झेंड्याखाली विरोधक एकवटले होते. त्यातील बहुतांश आता राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली कार्यरत आहेत. पालिकेत विरोधी पक्षनेते विजय कुंभार असले तरी, विरोधी गटात ताळमेळ नाही. त्यामुळे पालिकेच्या सभागृहात सत्ताधाऱ्यांतच विरोधकांची संख्या वाढू लागली आहे! ज्येष्ठ नगरसेवक बी. ए. पाटील, उपनगराध्यक्ष संजय कोरे, नियोजन सभापती खंडेराव जाधव आणि आता डांगे गटाचे चंद्रकांत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांनाच लक्ष करून त्यातही पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांच्याविरोधात बोलण्यास सुरुवात केली आहे.इस्लामपूर पालिकेत सध्या तीन गट कार्यरत आहेत. पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांचा गट प्रबळ मानला जातो. त्यामुळे नगराध्यक्ष कोणीही असो, कारभारी मात्र विजयभाऊच असतात. ते डोक्यावर बर्फ ठेवून राजकीय खेळी करण्यात तरबेज आहेत. त्यांनी डांगे गटाचे अॅड. चिमण डांगे, एन. ए. गु्रपचे खंडेराव जाधव यांच्याशी मिळतेजुळते घेतले आहे. संजय कोरे एन. ए. गु्रपचे असले तरी, ते सभागृहात सत्ताधाऱ्यांवर नेहमीच कुरघोड्या करताना दिसतात. अभ्यासू ज्येष्ठ नगरसेवक बी. ए. पाटील पूर्वीपासूनच सत्ताधाऱ्यांचेच विरोधक मानले जातात. त्यामुळे पालिकेतील प्रशासनावर ते नेहमी आगपाखड करताना दिसतात.ज्यावेळी पालिकेत विरोधकांची ताकद कमी आणि सत्ताधाऱ्यांची ताकद जास्त असते, त्यावेळी सत्ताधाऱ्यांतच फूट पडते, असा पालिकेतील राजकीय इतिहास आहे. नागरिक संघटनेतून अण्णासाहेब डांगे, अशोकदादा पाटील, बी. ए. पाटील बाहेर पडले. त्यांनी शहर सुधार समिती स्थापन केली. पुन्हा ही मंडळी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत झाली. तशीच परिस्थिती आता निर्माण झाली असून आगामी पालिका निवडणुकीत नेता एक, मात्र गट दोन, अशी अवस्था होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.सध्या जयंत पाटील यांच्याकडे मंत्रीपद नाही. त्यामुळे त्यांची पालिकेवरील पकडही ढिली झाली आहे. याचा फायदा सत्ताधाऱ्यांतील नगरसेवक उठवत आहेत. नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांच्याकडे प्रशासनातील बारकावे नसल्याने, त्यांचे नेते विजयभाऊ पाटील म्हणतील तीच पूर्वदिशा, असा कारभार सुरू आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांतील बी. ए. पाटील, संजय कोरे हे कायद्याच्या चाकोरीतून सत्ताधाऱ्यांवरच कडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच आता डांगे गटाचे चंद्रकांत पाटील यांनीही सभागृहातून काढता पाय घेतल्याने, भविष्यकाळात राष्ट्रवादीला फुटीचे ग्रहण लागण्याची शक्यता आहे.सत्ताधाऱ्यांच्या कारभारामुळेच सभात्यागमंगळवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत खुल्या नाट्यगृहाच्या नामकरणाचा विषय आला. या विषयपत्रिकेत जयंत पाटील आणि अशोकदादा पाटील यांचे नाव देण्याच्या नामकरण ठरावात दोन विषय करण्यात आले होते. वास्तविक असे करण्याची गरज नव्हती. त्यामुळे अशोकदादा पाटील यांच्या नावाची अवहेलना झाली. त्यातूनच आपण सभागृहाचा त्याग केला, असे मत डांगे गटाचे नगरसेवक चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
पालिकेत राष्ट्रवादीला फुटीचे ग्रहण
By admin | Updated: March 13, 2015 23:56 IST