इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मसुचीवाडी ग्रामपंचायतीच्या ११पैकी ९ जागा बिनविरोध झाल्या. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येथील पंचायत समितीचे सदस्य दत्तूआप्पा खोत व माजी सरपंच सर्जेराव कदम या दोन गटांमध्ये दिलजमाई केली. त्यामुळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. हे दोन्ही तुल्यबळ गट एकत्र आल्याने या निवडणुकीतून हुतात्मा गटाचा पत्ता आपोआप कट झाला.
मसुचीवाडी ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग क्र. ४ अ मध्ये ज्योती पाटोळे, राधिका पाटोळे, अनुराधा देवकुळे यांच्यामध्ये; तर ४ क मध्ये अमोल कदम आणि अमित कदम यांच्यामध्ये लढत होणार आहे. संजय कदम, पूजा माने, संजय खोत, उज्ज्वला फाटक, ज्ञानदेव कुंभार, शांताराम कदम, लतिका नांगरे-पाटील, संगीता सुतार, भारती गिरीगोसावी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, संजय पाटील, दत्तूआप्पा खोत आणि सर्जेराव कदम यांनी प्रयत्न केले. खोत आणि कदम हे राष्ट्रवादीमधील दोन गट एकत्र आल्याने या निवडणुकीतून हुतात्मा गटाचे अस्तित्व संपुष्टात आले.