लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या नव्या महापौरपदासाठी महिन्याभराचा कालावधी असताना, सत्ताधारी भाजपसह विरोधी काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीने काँग्रेसला डावलून महापौरपदासाठी जुळवाजुळव सुरू केली आहे. त्यामुळे काँग्रेस नगरसेवकांसह नेत्यांमध्येही नाराजी दिसत आहे. त्यात राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेवकांना महापौरपदाचे स्वप्न पडू लागल्याने पक्षांतर्गत नाराजीचा सामना करावा लागणार आहे.
महापालिकेच्या विद्यमान महापौर गीता सुतार यांची मुदत ८ फेब्रुवारीला संपत आहे. नूतन महापौरपदाची निवड फेब्रुवारीच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. पुढील महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपसह विरोधकांत इच्छुकांची संख्या मोठी आहे. भाजपमध्ये निरंजन आवटी, धीरज सूर्यवंशी, युवराज बावडेकर, ॲड. स्वाती शिंदे यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यात भाजपमधील काही नगरसेवक स्थायी समितीत डावलल्याने नाराज आहेत. त्यामुळे महापौरपदाची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
सत्ताधारी भाजपमध्ये नाराजीनाट्य रंगले असतानाच, विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीत सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. महापालिकेची निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र लढली होती. काँग्रेसला २०, तर राष्ट्रवादीला १५ जागा मिळाल्या होत्या. महापालिकेत काँग्रेस मोठा भाऊ असतानाही राष्ट्रवादीने महापौरपदासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी भाजपमधील नाराजांशी संपर्क वाढविला आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी नाराजांना संपर्क करून दिला जात आहे. बागवान यांनी महापौरपदासाठी जुळवाजुळव सुरू केल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेत्यांसह कोणत्याच नेत्यांशी चर्चा न करता राष्ट्रवादीकडून मोर्चेबांधणी केली जात आहे.
चौकट
राष्ट्रवादीतही नाराजी
मैनुद्दीन बागवान महाआघाडीच्या काळात १७ महिने महापौरपदावर होते. राष्ट्रवादीकडून त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने पक्षांतर्गत नाराजी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीत अनेक अनुभवी नगरसेवक असताना, पुन्हा बागवान यांनाच संधी कशासाठी, असा सवालही या नाराज नगरसेवकांकडून केला जात आहे.
चौकट
कोट
राष्ट्रवादीकडून महापौरपदासाठी मोर्चेबांधणी केली जात असली, तरी त्यांचे नेते अथवा नगरसेवकांनी काँग्रेससोबत कसलीची चर्चा केलेली नाही. महापालिकेत राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेस नगरसेवकांची संख्या अधिक आहे. शिवाय काँग्रेसकडेही इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे महापौरपदासाठी काँग्रेसकडूनच उमेदवार रिंगणात असेल. - उत्तम साखळकर, विरोधी पक्षनेते, महापालिका