रेश्मा यांचा मृतदेह बुधवारी सकाळी सातच्या दरम्यान ऐतवडे खुर्दला वारणा पुलाजवळ, तर ऋताचा मृतदेह दुपारी चारच्या दरम्यान पुलापासून तीनशे मीटरवर सापडला.
कुरळप पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बुधवारी सकाळी आठच्या दरम्यान ऐतवडे खुर्द येथे नदीपात्रामध्ये महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगताना ग्रामस्थांना दिसून आला. पोलीस पाटील मोहन नामदेव चांदणे यांनी पोलिसांना माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. यादरम्यान चिकुर्डे येथील सामाजिक कार्यकर्ते शहाजी भोसले यांना रात्री साडेअकराच्या दरम्यान महिला आणि मुलगी वारणा नदीच्या पुलावर बसलेल्या आढळून आल्या होत्या. भोसले यांनी त्यांची चौकशी केली. त्यावेळी धार्मिक विधीसाठी थांबल्याचे महिलेने सांगितले. त्या बसलेल्या ठिकाणी सकाळी भोसले यांना कागद व मोबाईल सापडला. भोसले यांनी कुरळप पोलिसांना ही माहिती दिली. त्या कागदावरील मजकुरातून दोघी कोडोली (ता. पन्हाळा) येथील असल्याचे समजले. अधिक तपासानंतर कोडोली येथील नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रेश्मा यांचा मृतदेह ओळखला.
रेश्मा यांचा मृतदेह सापडल्यानंतर कोल्हापूर येथील रेस्क्यू टीमला बोलावून बोटीच्या माध्यमातून पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला. चार वाजता ऐतवडे खुर्द येथे वारणा नदीवरील पुलापासून तीनशे मीटरवर मृतदेह आढळून आला. दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन पोतदार तपास करीत आहेत.
पतीचे निधन, दत्तक मुलगी मतिमंद असल्याने नैराश्य
‘माझा नवरा दारूच्या नशेने मृत झाल्याने मला कोणी वारस नाही. शिवाय मला स्वतःचे मूल नसल्याने मी तीन महिन्यांची मुलगी दत्तक घेतली होती. मात्र, पाच महिन्यांनी ती मतिमंद असल्याचे समजले. त्यातच ती मधुमेहाने त्रस्त असल्याने आम्ही दोघी नैराश्यातून आत्महत्या करत आहोत’, असे रेश्मा यांनी चिट्ठीमध्ये लिहून ठेवले आहे. पोलिसांनी ती चिठ्ठी ताब्यात घेतली आहे.