ओळी -
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या कुत्र्यांकडून अबालवृद्धांवर हल्ले होत आहेत. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलण्याची गरज असून, भटक्या कुत्र्यांसाठी कोंडवाडा तयार करावा, अशी मागणी भाजपच्या नगरसेविकांनी मंगळवारी आयुक्तांकडे केली.
याबाबत नगरसेविका स्वाती शिंदे म्हणाल्या की, शहरात २० ते २२ हजार भटकी कुत्री आहेत. ही भटकी कुत्री दिवसेंदिवस हिंसक बनत असून काही दिवसांपूर्वी आरोग्य कर्मचाऱ्यावरही हल्ला केला आहे. बदाम चौकात कुत्र्यांनी एका घोड्यावर हल्ला करून त्याला जखमी केले होते. नागरिकांकडून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते आहे; परंतु महापालिकेची यंत्रणा सक्षम नसल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेच्या मालकीच्या जागेवर भटक्या कुत्र्यांसाठी कोंडवाडा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे. प्रसंगी जिल्हा नियोजन समितीतून निधीसाठी पाठपुरावाही करावा, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. यावेळी नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील, सविता मदने, उर्मिला बेलवलकर उपस्थित होत्या.