गजानन पाटील ल्ल संखमुचंडी (ता. जत) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. इच्छुकांनी जोरदार मोर्चोबांधणी सुरु केली आहे. यावेळी मुचंडी गटाची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. नवीन झालेला हा जिल्हा परिषद मतदारसंघ इतर मागास महिला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. सुरुवातीपासून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या दांड्या गुल झाल्या आहेत. मतदार संघाची प्रथमच पुनर्रचना करण्यात आली आहे. दरीबडची मतदार संघातून नवीन मुचंडी मतदारसंघ तयार करण्यात आला आहे. तसेच मतदार संघात नव्याने खोजानवाडी पंचायत समिती गणाचा समावेश करण्यात आला आहे. जत, शेगाव, बिळूर, बनाळी मतदार संघातील नवीन ७ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी, उमेदवारांनी याबाबत सावध भूमिका घेतली आहे.पूर्व भागातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असा मुचंडी मतदारसंघ आहे. या मतदार संघाची लोकसंख्या ३१ हजार ७६६ इतकी आहे. मतदार संघात १६ गावांचा समावेश झाला. जत नगरपालिका झाल्याने जत गटातील अमृतवाडी, रामपूर, मल्लाळ ही ३ गावे, बिळूर गटातील येळदरी, खोजानवाडी, शेगाव गटातील वाषाण, बनाळी गटातील कोळगिरी या गावांचा नव्याने या गटात समावेश करण्यात आला आहे. विस्ताराने सर्वात मोठा असा हा मतदारसंघ झाला आहे. या मतदार संघात आ. विलासराव जगताप, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विक्रम सावंत, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश शिंदे, माजी आ. उमाजीराव सनमडीकर या दिग्गज नेत्यांचे समर्थक कार्यरत आहेत. सध्या मतदार संघातील महिला व बालकल्याण सभापती सुनंदा पाटील (मुचंडी), काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य बयाजी पडोळकर (अमृतवाडी), राष्ट्रवादीचे पं. स. सदस्य मारुती डावरे (रामपूर) हे सदस्य प्रतिनिधीत्व करीत आहेत. या मतदार संघात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाचे उमेदवार असणार आहेत. मात्र खरी लढत भाजप, काँग्रेसमध्येच होणार आहे. या मतदार संघातील बहुतांश ग्रामपंचायती, सोसायटीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसची सत्ता आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी रामगोंडा संती यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.नव्याने अस्तित्वात आलेल्या मुचंडी जिल्हा परिषद, पंचायत गण, खोजानवाडी पंचायत गण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. जिल्हा परिषद गट इतर मागास प्रवर्ग महिलांसाठी, मुचंडी गण सर्वसाधारण महिलांसाठी व खोजानवाडी पंचायत गण इतर मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. प्रथमच महिलाराज येणार आहे.जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रीय काँग्रेसकडून सुलोचना तम्माण्णा हंजगी (मुचंडी), भगीरथी भीमराव जाधव-बजंत्री (वळसंग), तर भाजपमधून विमल दिनेशकुमार तेली (मुचंडी), अॅड. म्हाळाप्पा पुजारी यांच्या पत्नी यांची नावे चर्चेत आहेत. पंचायत समिती गणातून काँग्रेसकडून पुष्पाताई धोंडीराम चव्हाण (वळसंग), मंगल विठ्ठल वाकसे (सोरडी), कालिंदा भाऊसाहेब पाटील (सोरडी), जिजाबाई तानाजी नरळे यांची नावे चर्चेत आहेत. खोजानवाडी पंचायत गणातून काँग्रेसकडून सावित्री म्हाळाप्पा माने (पाच्छापूर), गुंडव्वा तम्माण्णा चौगुले (खोजानवाडी), महादेवी मुरग्याप्पा दयांगडे, वैजयंता कोलेकर (रामपूर), भाजपमधून आप्पा दुधाळ यांच्या पत्नी, कमल विठ्ठल चंदी, राजाराम सोनुर यांची पत्नी आदी इच्छुक आहेत. मतदारसंघ नवीन असल्यामुळे उमेदवारी देताना गावांचा समतोल निर्माण करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. प्रत्येक पक्षाने उमेदवारीबाबत गुप्तता पाळली आहे. जात हा घटक प्रभावी ठरणार आहे. मोठ्या लोकसंख्येचे गाव पाहून उमेदवारी दिली जाणार आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.राष्ट्रवादीची भूमिका गुलदस्त्यातराष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांचा गट आहे. त्यांच्या पत्नी सुनंदा पाटील महिला व बालकल्याण सभापती आहेत. ते निवडणुकीत स्वतंत्र लढणार, की काँग्रेस, भाजपबरोबर युती करणार? हा प्रश्न मात्र सध्या तरी गुलदस्त्यात आहे. त्यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. त्यांच्यावरच निकालाची गणिते ठरणार आहेत.
मुचंडीचा नवा मतदारसंघ ठरणार लक्षवेधीमहिलांसाठी राखीव : जोरदार मोर्चेबांधणी सुरू; राखीव मतदार संघाने इच्छुकांच्या दांड्या गुल
By admin | Updated: December 25, 2016 23:51 IST