लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील अनेक भागाला रविवारी गढूळ पाण्याचा पुरवठा झाला. पाण्याला मातकट वास येत असल्याने ते कसे प्यावे, असा प्रश्न नागरिकांना पडला होता. आधीच कोरोना संसर्गामुळे नागरिक हैराण असताना दूषित पाण्यामुळे आरोग्याचा धोका आणखी वाढणार आहे.
गेल्या आठवड्यात शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळी दहा ते बारा फुटाने वाढली. नदीपात्रातही गढूळ पाणी आहे. त्यात रविवारी शहरातील खणभाग, गव्हर्न्मेंट कॉलनी, मीरानगर भागात मातीमिश्रीत पाण्याचा पुरवठा झाला.
महापालिकेने काही वर्षांपूर्वी माळबंगला येथे ७५ एमएलडीचे अत्याधुनिक जलशुद्धीकरण उभारले आहे. तरीही या जलशुद्धीकरण केंद्रातून गढूळ पाण्याचा पुरवठा झाल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या अजूनही घटलेली नाही. दररोज ९० ते १०० रुग्ण सापडत आहेत. अशातच गढूळ पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.