इस्लामपूर : आमदारकी गेली उडत, अगोदर शेतकऱ्यांच्या घामाचा दाम द्या. जिल्ह्यातील पूर्ण एफआरपी न दिलेल्या कारखान्यांनी राहिलेली रक्कम व्याजासह द्यावी. यापुढे गाळप होणाऱ्या ऊसाची एफआरपी एकरकमी द्यावी, या मागणीसाठी ८ मार्चला राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याला अभिषेक घालणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अॅड. एस. यु. संदे यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत सांगितले.
संदे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत बैठक घेऊन एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेत तो अमलातही आणला. त्याच पद्धतीने सांगली जिल्ह्यातही एकरकमी एफआरपी देणे अपेक्षित होते. तथापि, जिल्ह्यातील कारखानदारांची तशी इच्छा दिसत नाही. त्यामुळे संघटनेने पुढाकार घेऊन नोव्हेंबरमध्ये कडेगाव येथे बैठकीचे आयोजन केले होते. त्यामध्ये सर्व कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचे कबूल केले. आमदार मोहनराव कदम यांनी सोनहिरा आणि उदगिरी कारखाना एकरकमी एफआरपी देईल असे जाहीर केले. मात्र, इतरांनी हा तोडगा न पाळता निराशा केली.
ते म्हणाले, सांगली जिल्ह्यातील सोनहिरा, उदगिरी आणि दालमिया हे तीन कारखाने वगळता इतर कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे पाडले. १५ दिवसांच्या आत एफआरपी देण्याच्या कायद्याचा भंग केला आहे. त्यामुळे या कारखानदारांना सुबुद्धी सुचावी आणि शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे त्यांना त्वरित मिळावेत, यासाठी कोविड आणि जमावबंदी आदेशाचे पालन करून ८ मार्चला सकाळी अकरा वाजता राजारामबापू कारखाना कार्यस्थळावरील बापूंच्या पुतळ्याला हा अभिषेक घालणार आहोत.
यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य आप्पासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष भागवत जाधव, रमेश पाटील उपस्थित होते.
चौकट
घामाचा दाम मिळवून देणे आमच्यासाठी आमदारकीपेक्षा मोठे
राजू शेट्टी यांच्या आमदारकीसाठी दबाव टाकणारे हे आंदोलन आहे का? या प्रश्नावर संदे यांनी आमदारकी गेली उडत, त्यापेक्षा आम्हांला शेतकऱ्यांच्या हक्काची लढाई लढणे महत्त्वाचे वाटते. त्याच्या घामाचा दाम मिळवून देणे आमच्यासाठी आमदारकीपेक्षा मोठे आहे, असे स्पष्ट केले.