सांगली : जिल्ह्याच्या कमाल तापमानात पुन्हा वाढ झाली असून मंगळवारी पारा ४० अंशावर गेला. दुसरीकडे किमान तापमानही आता २४ अंशांवर गेल्याने चोवीस तास उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार आठवडाभर कमाल तापमान ३९ ते ४० अंशाच्या तर किमान तापमान २३ ते २४ अंशाच्या घरात राहणार आहे. जिल्ह्याचा पारा वाढत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हाच्या तीव्र झळांचा सामना नागरिकांना करावा लागत आहेत. सध्याचे कमाल तापमान सरासरीपेक्षा २ ने तर किमान तापमान सरासरीपेक्षा ३ अंशाने अधिक आहे. जिल्ह्यातील सकाळी नोंदली गेलेली सापेक्ष आर्द्रता सध्या ८० टक्के नोंदली गेली आहे. आठवडाभर पावसाची कोणतीही शक्यता नाही. आकाश निरभ्र राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.