कुपवाड : मिरज औद्योगिक वसाहतीमधील खराब झालेल्या रस्त्याप्रकरणीची फेरनिविदा प्रक्रिया लवकरच राबविली जाणार असून पावसाळा झाल्यावर या खराब रस्त्याची दुरूस्ती करण्यात येईल, असे अश्वासन औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता प्रमोद शेटके यांनी आज उद्योजकांना दिले.मिरज औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. महापालिकेच्या स्थापनेनंतर या औद्योगिक वसाहतीमध्ये एक रूपयाचा निधीही खर्च झाला नाही. त्यामुळे उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यापार्श्वभूमीवर उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मिरज औद्योगिक वसाहतीला भेट दिली होती. त्यावेळी राणे यांनी रस्त्यासह गटारी व पथदिव्यासाठी निधी देण्याविषयीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांच्या आश्वासनानंतर औद्योगिक विकास महामंडळाकडून रस्त्याची नऊ कोटीची निविदाही काढण्यात आली होती. निविदेच्या प्रक्रियेची मागील महिन्यात वर्षपूर्तीही झाली होती. तरीही औद्योगिक विकास महामंडळाकडून या खराब झालेल्या रस्त्यांची दुरूस्ती केली जात नव्हती. त्यामुळे उद्योजक नाराज झाले होते. अखेर आज सांगली मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके, संजय खांबे, माधव कुलकर्णी, सागर पाटील यांच्या नेतृत्वाखालील उद्योजकांच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता शेटके यांची भेट घेऊन पाहणी करण्याची विनंती केली होती. त्यांनीही उद्योजकांच्या विनंतीला प्रतिसाद देऊन मिरज एमआयडीसीमधील खराब रस्त्यांची पाहणी केली. रस्त्यांची पाहणी केल्यावर त्यांनी लवकरच फेरनिविदेची प्रक्रिया राबविण्याविषयी मत स्पष्ट करून पावसाळ्यानंतर रस्त्याची दुरूस्ती करण्याचे अश्वासन दिले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यातील खड्डयामध्ये मुरूमही भरून देण्याची मागणी उद्योजकांनी केली. यावेळी विजय जेरे, उपकार्यकारी अभियंता मलाबादे, सुबोध नागमोती, गणेश निकम आदी उद्योजक उपस्थित होते. (वार्ताहर)
एमआयडीसी रस्त्यांची पावसाळ्यानंतर दुरूस्ती
By admin | Updated: September 1, 2014 23:09 IST