कवठेमहांकाळ/देशिंग : म्हैसाळ योजनेची पाणीपट्टी सात-बारावर चढविण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याने या पाणीपट्टीचा प्रश्न लवकरच विधानसभेत मांडणार असल्याची ग्वाही आमदार सुमनताई पाटील यांनी खरशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथील दुष्काळी भागाच्या पाहणी दौऱ्यात दिली.दरम्यान, सुमनताई यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील लोकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी दुष्काळी भागाच्या पाहणी दौऱ्याचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी भागात त्या तब्बल सहा दिवस दौरा करणार आहेत.आमदार पाटील म्हणाल्या, येत्या आठ दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून म्हैसाळ योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तालुक्यातील मळणगाव, बोरगाव, अलकूड, खरशिंग, देशिंग, शिंदेवाडी, बनेवाडी आदी गावांचा पाहणी दौरा रविवारी त्यांने केला. यावेळी अधिकाऱ्यांना समस्या सोडविण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांकडून म्हैसाळ योजना तसेच बनेवाडी उपसा सिंचन योजना चालू करा, चारा डेपो सुरू करा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांनी, म्हैसाळची पाणीपट्टी सात-बारावर चढविण्याच्या कार्यवाहीस तीव्र विरोध असून तो निर्णय त्वरित रद्द न झाल्यास रस्त्यावर उतरणार असल्याचे आ. पाटील यांना सांगितले.यावेळी आरोग्य सभापती गजानन कोठावळे, जिल्हा बॅँकेचे संचालक सुरेश पाटील, जिल्हा परिषद सदस्या दत्तात्रय पाटील, भाऊसाहेब पाटील, माजी सभापती सुरेखा कोळेकर, स्मिता पाटील, सुहास पाटील, संभाजी पाटील, पंचायत समितीचे पदाधिकारी, महावितरणचे अधिकारी, उपसरपंच विजय क्षीरसागर उपस्थित होते. सकाळी साडेनऊ वाजता बोरगाव येथून आमदार पाटील यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली. मळणगाव येथे शेतकऱ्यांनी म्हैसाळ योजनेच्या पाण्याची मागणी केली. तसेच निकृष्ट झालेले रस्तेही दुरुस्त करण्याबाबत मागणी केली. वीज महावितरणबाबतच्या तक्रारींचा पाढा आजही नागरिकांनी वाचला. यावर आ. सुमनताई पाटील यांनी, वीज महावितरणने नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिला. यावेळी सरपंच रमेश भोसले, दत्ता क्षीरसागर, राजाराम पाटील, कांताताई भोसले यांनी मळणगाव येथील प्रश्न उपस्थित करून, ते तातडीने सोडविण्याची आमदार पाटील यांच्याकडे मागणी केली. अलकूड (एम) येथेही म्हैसाळ योजनेच्या पाण्यावर शेतकरी आक्रमक झाले. अलकूड (एम) चे उपसरपंच मधुकर पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी एसटी गाड्या अलकूड (एम) च्या थांब्यावर थांबत नसल्याचे तक्रार केली. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ते आमदार पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी आमदार पाटील यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत विद्यार्थ्यांसाठी एसटी थांबलीच पाहिजे, अशी सूचना केली. उपस्थित एसटी अधिकाऱ्यांनी उद्यापासून एसटी थांबविण्याची मागणी मान्य केली. खरशिंग येथे म्हैसाळच्या पाण्यावर शेतकरी चांगलेच आक्रमक झाले. माजी उपसरपंच दत्तात्रय पाटील यांनी शासन शेतकऱ्यांच्या सात-बारावर पाणीपट्टीचा बोजा चढवू लागले आहे. तो थांबविण्यासाठी व शेतीला पाणी मिळण्यासाठी सुमनताई तुम्ही रस्त्यावर उतरा, पूर्ण ताकदीनिशी आम्ही सर्व शेतकरी तुमच्या पाठीशी राहू व तुम्हाला बळ देऊ, असे सांगितले. यावेळी या दौऱ्यात आमदार सुमनताई पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते विजयराव सगरे, स्मिता पाटील, गजानन कोठावळे, दत्ताजीराव पाटील, उपसभापती जगन्नाथ कोळेकर, सुरेखा कोळेकर, भाऊसाहेब पाटील, टी. व्ही. पाटील, भानुदास पाटील, सुहास पाटील, आप्पासाहेब कोळेकर, मोहन खोत, मनोहर पाटील यांच्यासह वीज महावितरण, सार्वजनिक बांधकाम, पंचायत समिती, एस. टी. महामंडळ, आरोग्य विभाग आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)आमदारांसमोर अधिकाऱ्यांची उडाली भंबेरीरांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथे आ. सुमनताई पाटील यांनी सर्व खातेप्रमुखांसमवेत आढावा बैठक घेतली. यामध्ये गावातील नागरिकांनी व नेतेमंडळींनी वीज वितरण कंपनीचा मनमानी कारभार, निकृष्ट रस्त्यांची कामे, म्हैसाळचे पाणी, पुरवठा विभागाचा कारभार, दुष्काळी परिस्थिती अशा अनेक अडचणी व तक्रारी मांडल्या. यावेळी आॅफिसमध्ये बसून अधिकार गाजविणाऱ्या अधिकाऱ्यांची नागरिकांच्या प्रश्नांचा उत्तरे देताना भंबेरी उडत होती. यावेळी आ. पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेत कामे करण्याच्या सूचना केल्या. यावेळी माजी सरपंच नारायण पवार यांनी वीज वितरणचे सहाय्यक अभियंता मनमानी करभार करीत असून, त्यांच्या बदलीची मागणी केली. तर सध्या गावाला एक महिनाभर पुरेल एवढेच पिण्याचे पाणी असून, नांगोळे प्रादेशिक योजनेतून पाणी आणावे, अशी मागणी करण्यात आली.स्मारक पूर्ण करण्याची मागणी मळणगाव येथे साहित्य क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या चारुता सागर यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी मळणगाव येथील नागरिकांनी आमदार सुमनताई पाटील यांच्याकडे केली. आबा असताना चारुता सागर यांचे स्मारक करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली होती. ती आमदार सुमनताई पाटील यांनी पूर्ण करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
‘म्हैसाळ’ पाणीपट्टीचा प्रश्न विधानसभेत मांडणार
By admin | Updated: November 30, 2015 01:12 IST