सुरेंद्र शिराळकर --आष्टानगरपरिषदेची निवडणूक २०१६ च्या अखेरीस होत आहे. मागील अनेक वर्षे १९ नगरसेवकांना नगरसेवक पदाची संधी मिळत होती. त्याऐवजी यावर्षीपासून २१ नगरसेवक असणार आहेत. यापैकी तब्बल ११ जागांवर महिलांना संधी मिळणार असल्याने पालिकेत आता महिलाराज येणार आहे. काँग्रेस, शिवसेना, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र लढण्याच्या तयारीत असताना माजी आमदार विलासराव शिंदे सलग पाचव्यांदा विजय मिळवित पंचमी साजरी करणार का?, याची शहरात चर्चा सुरू आहे.आष्टा शहराची लोकसंख्या सुमारे ३७ हजार १०५ आहे. एकूण मतदार २६ हजार ११८ आहेत. यातील पुरुष मतदार १३ हजार ५५६ आहेत, तर स्त्री मतदार १२ हजार ५६२ आहेत. १९९६ पासून विलासराव शिंदे यांच्या आष्टा शहर विकास आघाडीची पालिकेवर निर्विवाद सत्ता आहे. माजी ग्रामविकासमंत्री आ. जयंत पाटील यांचा गटही पालिकेच्या सभेत सहभागी असल्याने पालिकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. १९९६ पासून २०११ पर्यंत जयंत पाटील शिंदे गटाचेच नगरसेवक असून, केवळ २००६ च्या पालिका निवडणुका बिनविरोध झाल्याने, पालिका इतिहासात प्रथमच शिवसेनेच्या विनायक इंगवले यांना नगरसेवक पदाची संधी मिळाली होती. २०११ च्या पालिका निवडणुकीत विलासराव शिंदे गटाच्या विशाल शिंदे, दिनकर बसुगडे, झिनत आत्तार, सुवर्णा हबळे, झुंझारराव पाटील, कलगोंडा वग्याणी, बाबासाहेब सिध्द, संगीता सूर्यवंशी, रागिणी सावंत, मंगलादेवी शिंदे, धैर्यशील शिंदे, संजय घस्ते, रंजना शेळके या १३ जणांना संधी मिळाली, तर आ. जयंत पाटील गटाच्यावतीने संगीता वारे, जमिलाबी लतीफ, पद्मश्री मालगावे, आंनदा ढोले, नीता काळोखे, विजय मोरे या सहा उमेदवारांना नगरसेवक पदाची लॉटरी लागली होती. पालिकेच्या डिसेंबरअखेर निवडणुका होत असताना, शिंदे-पाटील गटाबरोबर विरोधकांतूनही नगरसेवक पदासाठी चढाओढ लागली आहे. पालिकेच्या सध्याच्या नगरसेवकांची संख्या १९ आहे, तर नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षणात एकूण २१ प्रभाग झाले आहेत. यातील स्त्रियांसाठी ११, तर पुरुषांसाठी १० प्रभाग राखीव आहेत.खुल्या गटातील पुरुषांना सहा, महिलांना सहा असे १२ प्रभागात उभे राहता येणार आहे. ओबीसी गटातील तीन महिला व तीन पुरुषांना संधी मिळणार आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या दोन स्त्री व एका पुरुष उमेदवारास संधी मिळणार आहे. प्रारंभी एका प्रभागात एकच उमेदवार उभारणार असल्याची चर्चा असल्याने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. आता २ प्रभागांचा एक प्रभाग झाल्याने अनेकांनी सुटकेचा श्वास टाकला. गतवेळी विरोधकांनी जास्त मते घेऊन देखील केवळ एकी नसल्याने त्यांना विजय मिळवता आला नव्हता. यातून बोध घेऊन विरोधकांच्या एकीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आ. जयंत पाटील गटाचे नेतृत्व जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील करीत असून २१ प्रभाग झाल्याने त्यांची संख्या ६ वरून ७ होणार, की आणखी वाढणार, याकडे आ. पाटील गटाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. शिंदे गटातही अनेकजण इच्छुक असून, विद्यमान कोणाला अर्धचंद्र मिळणार, याची चर्चा आहे. पालिका निवडणुकीला काही दिवसांचा अवधी असताना विरोधकांनी जोरदार फिल्डिंग लावल्याने माजी मा. विलासराव शिंदे पंचमी साजरी करणार, विरोधक बाजी मारणार, याची जोरदार चर्चा सुरू आहे. या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिल्याने राजकीय नेत्यांनीही आता कंबर कसली आहे. त्यातच आरक्षणामुळे परिस्थिती बदलल्याने नेत्यांसह येथील विद्यमान उमेदवारांसाठीही ही निवडणूक महत्त्वाची ठरली आहे. प्रभागाची रचना : लोक संख्येनुसारसध्या तीन ते चार प्रभागांचा एक प्रभाग असून, शासनाच्या नवीन नियमानुसार दोन प्रभागांचा एक प्रभाग होणार आहे. यात एक स्त्री व एक पुरुष उमेदवार असणार आहे. एका प्रभागाची रचना लोकसंख्येच्या प्रमाणात करण्यात येणार असल्याने सुमारे ३५०० च्या दरम्यान मतदार एका प्रभागात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे २१ प्रभागांतील प्रभागांची संख्या १० राहणार आहे. ९ प्रभाग २ प्रभागांचे, तर एक प्रभाग ३ प्रभागांचा होणार आहे.
आष्टा पालिकेत आता महिलाराज...
By admin | Updated: May 23, 2016 00:17 IST