सांगली : कोरोनाचा धोका पुन्हा वाढत असल्याने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून, लग्नासाठी लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. आता यासाठी ५० लोकांचीच मर्यादा असणार आहे. याचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिला.
कोरोना उपाययोजनासंदर्भात मंगल कार्यालयचालक व केटरिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, शासनाच्या निर्देशानुसार ५० लोकांच्या उपस्थितीतच यापुढे कार्यक्रम घेतले जावेत. कोराेनाचा संसर्ग वाढणार नाही, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तरीही नियमांचे पालन न केल्यास मंगल कार्यालय चालकासह दोन्ही बाजूच्या यजमानांवरही कारवाई करण्यात येणार आहे. मंगल कार्यालये, केटरिंगचालकांनी सहकार्य केल्यास संभाव्य धोका टाळता येणे शक्य आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, वारंवार साबणाने हात धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दी टाळणे, अनावश्यक बाहेर न जाणे या बाबींचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. त्याचबरोबर कोमॉर्बिड रुग्णांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.