तांदूळवाडी : कुंडलवाडी ता. वाळवा येथे हिंदू व मुस्लीम समाजातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर जुन्या काळातील रितीरिवाजानुसार कार्यक्रम घेण्यात येत होते. पण सध्या या रितीरिवाजांना बाजूला ठेवून या प्रसंगी नवीन तीन दिवसाची कार्यप्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे लोकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
कुंडलवाडी येथे सर्व धर्मातील लोक राहतात. यापैकी मुस्लीम व हिंदू समाजाचे इतर जातींच्या तुलनेत अधिक प्रमाण आहे. हिंदू व मुस्लीम समाजामध्ये मोठमोठ्या भावक्या आहेत. याचा परिणाम दोन्ही समाजातील एखादी व्यक्ती मयत झाली तर संपूर्ण भावकीला १५ दिवस अडचणी निर्माण होत आहेत. त्यांना कोणतेही शुभ कार्य करता येत नाही, असा जुन्या काळातील रितीरिवाज आहे. गेल्या वर्षी कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूंचे संकट निर्माण झाले. तेव्हापासून गावातील एखादी व्यक्ती मयत झाली की मोजकेच लोक अंत्यसंस्कार असो किंवा रक्षाविसर्जनस उपस्थित राहतात. सध्या येथील मुस्लीम व मराठी समाजातील लोकांनी जुन्या काळातील रितीरिवाज व परंपरा बाजूला ठेवून दोन्ही समाजातील एखादी व्यक्ती मयत झाली तर त्याचे १५ दिवस चालू राहणारे कार्यक्रम सध्या तिसऱ्या दिवशीच पूर्ण करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे भावकीतील घेण्यात येणारे शुभ कार्यक्रम लांबणार नाहीत. या निर्णयाचे सर्वांनीच स्वागत केले आहे.