खानापूर : मार्गशीर्ष अमावास्येपासून सुरू होणाऱ्या खानापूर येथील खिलार जनावरांच्या यात्रेस बुधवारी प्रारंभ झाला. यात्रेची सुरुवात दरवर्षानुसार शेळ्या-मेंढ्यांच्या बाजाराने झाली. शेळ्या-मेंढ्यांचा बाजार अजून दोन दिवस चालणार असून, शनिवारपासून खिलार जनावरांच्या बाजारास सुरुवात होणार आहे. बुधवारी शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात आवक चांगली झाली. मात्र चलन तुटवड्यामुळे दर पडले व व्यवहार जेमतेम झाले. मात्र पहिल्यादिवशी तीन ते चार लाख रुपयांचे व्यवहार झाले. शेळ्या-मेंढ्यांचा बाजार गुरुवारी व शुक्रवारी भरणार असल्याने पुढील दोन दिवसात चांगले व्यवहार होण्याची अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. पहिल्यादिवशी शेळ्या-मेंढ्यांची आवक चांगली झाली. मात्र गेल्या महिन्यापासून नोटाबंदीमुळे सर्वत्र जाणवणाऱ्या आर्थिक मंदीचा फटका यात्रेमधील व्यवहारास बसला. बुधवारी सकाळी दर तेजीत होता, मात्र चलन तुटवड्यामुळे मागणी कमी झाली व दर पडले. यामुळे शेतकऱ्यांत नाराजी पसरली. चलन तुटवड्यामुळे ‘शेतकरी टु शेतकरी’ व्यवहार फार कमी झाले. झालेले बहुतेक व्यवहार व्यापारी वर्गाकडून झाले. बाजारात एक वर्षाच्या बोकडास पाच ते सहा हजार रुपये दर मिळाला. शेळ्यांनाही पाच ते सहा हजारापर्यंत दर मिळाला, तर शेळी व दोन कोकरांना सात ते अकरा हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. दीड- दोन वर्षाच्या बोकडास सात ते आठ हजार रुपये दर मिळाला. बाजारात मेंढ्यांची आवक कमी होती. मेंढीचा दर सात ते आठ, तर एक वर्षाच्या मेंढ्याचा दर आठ ते अकरा हजारपर्यंत होता. बाजार जुन्या बसस्थानकालगतच्या खासबाग मैदानात भरला होता. संयोजन नगरपंचायत व कृषी उत्पन्न बाजार समितीने केले आहे. (वार्ताहर)नवीन वर्षामधील : पहिली यात्राशनिवारपासून खिलार जनावरांच्या बाजारास सुरुवात होणार आहे. नवीन वर्षामधील पहिली यात्रा म्हणून ‘खानापूर यात्रा’ ओळखली जाते. शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात खानापूरबरोबरच आटपाडी, तासगाव तालुक्यामधून शेळ्या-मेंढ्यांची आवक झाली होती, तर खरेदीसाठी सांगली, कऱ्हाडबरोबर कोकणामधील व्यापारी वर्गाने हजेरी लावली होती.
खानापूरमध्ये खिलार यात्रा
By admin | Updated: December 29, 2016 00:18 IST