विटा : खानापूर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले. सोमवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी ३५० पैकी १२८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे तांदळगाव आणि भडकेवाडी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तसेच पारे ग्रामपंचायतीचे ७ आणि शेडगेवाडी ग्रामपंचायतीचा १ असे आठ सदस्यही बिनविरोध झाल्याने उर्वरित ८६ जागांसाठी २०० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीत दुरंगी, तर माहुली गावात तिरंगी लढत होत आहे. खानापूर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या ग्रामपंचायतींच्या ४२ प्रभागातील १०८ जागांसाठी ३५० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सोमवारी त्यातील १२८ जणांनी माघार घेतली. त्यामुळे तांदळगाव आणि भडकेवाडी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. पारे ग्रामपंचायतीच्या ११ जागांपैकी ७ जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित ४ जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत.
माहुली ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात असल्याने येथे तिरंगी लढत होत आहे, तर रेणावी येथील ९ जागांसाठी २४ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. तालुक्यातील नागेवाडी, मंगरूळ, खंबाळे (भा.), भिकवडी बुद्रुक, देविखिंडी, पोसेवाडी, शेडगेवाडी व मेंगाणवाडी येथे दुरंगी लढत होत आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी तालुक्यातील अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
चौकट
पारे, तांदळगाव ग्रामपंचायतींवर भगवा
खानापूर तालुक्यातील पारे ग्रामपंचायतीत सोमवारी आ. अनिल बाबर समर्थक गटाचे ७ सदस्य बिनविरोध झाले. त्यामुळे सोमवारी या सात नूतन सदस्यांचा आ. बाबर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जि. प.चे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्यासह पारे गावातील कार्यकर्ते उपस्थित होते. पारे ग्रामपंचायतीच्या उर्वरित ४ जागाही मोठ्या फरकाने जिंकण्याचा मानस यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. तसेच तांदळगाव ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असून ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.
फोटो - ०४०१२०२१-विटा-ग्रामपंचायत निवडणूक
ओळ :
पारे ग्रामपंचायतीत आ. अनिल बाबर गटाचे सात सदस्य बिनविरोध निवडून आल्यानंतर आ. बाबर यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जि. प. माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.