शिवसेना हा मूळचा महाराष्ट्राचा पक्ष असूनही सांगली जिल्ह्यात पक्षाची फारशी ताकद दिसत नव्हती. त्यामुळे शिवसेनेला नेहमीच संघर्ष करावा लागला. याचा विचार करून आ. अनिलभाऊ यांनी सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे नेतृत्व स्वीकारले. शिवसेनेचे धनुष्यबाण घेऊन आ. अनिलभाऊ विधानसभेच्या मैदानात उतरले. त्यावेळी मोठा संघर्ष असतानाही आ. अनिलभाऊ यांनी मोठ्या मताधिक्यांनी विजयी होत वादळात दिवा लावला. तेव्हापासून मतदारसंघातील शेतकऱ्यांचे दारिद्र्य संपविण्याचा विडा त्यांनी उचलला.
गेल्या दोन टर्मपासून मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करीत असताना शिवसेना पक्षाच्या माध्यमातून अनेक विकासात्मक भूमिका घेतल्या. सांगली जिल्ह्यात शिवसेनेला पक्ष वाढीसाठी नेहमीच संघर्ष करावा लागला. मात्र, दुष्काळी खानापूर मतदारसंघातील आ. अनिलभाऊ बाबर यांच्या रूपाने शिवसेनेला जिल्ह्यात मोठा व तगडा पर्याय मिळाला आहे. दुष्काळी मतदारसंघाचे नेतृत्व करीत असताना त्यांना मूळचा अनेक विषयाचा अभ्यास असल्याने शासन दरबारी बरेचसे प्रश्न सोडवून घेण्यास त्यांना त्रास झाला नाही. आ. अनिलभाऊ यांच्यामुळे खानापूर मतदारसंघात शिवसेनेची पाळेमुळे घट्ट झाली आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू म्हणून परिचित असलेल्या आ. अनिलभाऊ यांनी टेंभू योजनेचे पाणी दुष्काळी खानापूर मतदारसंघात आणले. आ. अनिलभाऊंमुळे खानापूर-आटपाडी मतदारसंघातील ग्रामीण भागात शिवसेना पक्षाने मोठी उभारी घेतली आहे. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना पक्षाने मोठे यश मिळविले आहे. ते सर्व आ. अनिलभाऊंच्या अभ्यासू नेतृत्वामुळे शक्य झाले आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
- इंजि. किशोर नलवडे, विटा