लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : खासदार संजयकाका पाटील यांनी दिल्लीत केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांची भेट घेऊन सांगली जिल्ह्यात नवीन केंद्रीय विद्यालय स्थापन करण्याबाबतचे पत्र दिले. या मागणीस धोत्रे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
याबाबत खासदार संजयकाका पाटील म्हणाले, जिल्ह्यातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सांगली जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय असणे आवश्यक आहे. पुणे व सोलापूर येथे केंद्रीय विद्यालये अस्तित्वात असून सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांत मात्र एकही केंद्रीय विद्यालय कार्यरत नाही. त्यामुळे केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी व त्यांच्या पाल्यांना पुणे किंवा सोलापूर येथे जावे लागते. याकरिता सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही केंद्रीय विद्यालयात शिकता यावे, यासाठी केंद्रीय शिक्षणमंत्री संजय धोत्रे यांना मागणीचे निवेदन दिले आहे.