लोकमत न्यूज नेटवर्क
कवठेएकंद : कवठेएकंद (ता. तासगाव) ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गावाच्या विकासाच्या मुद्द्यावर सत्तांतर घडवून आणले. आता नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या आहेत. गावातील नव्या कारभाऱ्यांसमोर कर वसुली, अतिक्रमणाचा प्रश्न ही जुनीच आव्हाने कायम आहेत. यामुळे ते नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणार का? हे येणारा काळच निश्चित करेल.
गावात सुरळीत व शुद्ध पाणीपुरवठा, गटार व परिसर स्वच्छता, कचरा उठाव, दिवाबत्तीची सोय, सार्वजनिक ठिकाणचे पार्किंग, अतिक्रमणे, घरपट्टी व पाणीपट्टी वसुली अशी जुनीच आव्हाने नव्या कारभाऱ्यांसमोर आहेत.
मागील ग्रामपंचायत कारभाऱ्यांच्या नियोजनाअभावी पिण्याचा पाणीप्रश्न निर्माण झाला होता. विस्कळीत पाणीपुरवठा हा मुद्दा निवडणुकीच्या केंद्रस्थानी होता. बडे थकबाकीदार हे सुद्धा विकास कामातील अडथळे ठरले आहेत. घरपट्टी व पाणीपट्टी अशा थकबाकीची रक्कम दोन कोटीच्या जवळपास आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यास प्रोत्साहन मिळाले नसल्याने मागील काही वर्षापासून थकबाकीचा आकडा फुगला आहे.
याचा ग्रामपंचायतीकडील वित्त आयोगातील योजनांवरही परिणाम झाला आहे. सार्वजनिक परिसराची स्वच्छता, गटारांची समस्या, गावाबाहेरील रस्त्यावरील दिवाबत्तीची सोय व विस्कळीत वाहतुकीला शिस्त, आठवडा बाजाराचे नियोजन, जागोजागीचे अतिक्रमण याबाबत प्रभावीपणे काम करण्याची अपेक्षा ग्रामस्थांतून व्यक्त होत आहेत.
कोट
जनतेने निवडून दिलेले सर्व सदस्य गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील असतील. राजकीय भेदभाव न करता लोकांच्या विश्वासाला पात्र राहून काम करू. नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टी जमा करून प्रशासनाला सहकार्य करावे.
- राजेंद्र शिरोटे, सरपंच