फोटो ओळ : कडेगाव शहरातील शिवभोजन थाळी केंद्राबाहेर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत रांगेत उभे राहिलेले लाभार्थी.
प्रताप महाडिक
लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव :
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात संचारबंदीसह कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे हातचा रोजगार गेल्याने मजूर आणि कष्टकरी वर्गाचे मोठे हाल झाले आहेत. अशा स्थितीत
कडेगाव शहरात दररोज २२५ लोकांच्या पोटाची भूक शमविण्याचे काम शिवभोजन थाळी केंद्र करत आहे.
लॉकडाऊनमध्ये हाताला काम नाही आणि खायला अन्न नाही, अशा कोंडीत कित्येक गोरगरीब लोक सापडले आहेत. या संकटकाळात शिवभोजन योजनेचा त्यांना आधार मिळत आहे. या योजनेअंतर्गत १५ एप्रिल ते १४ मेपर्यंत मोफत जेवण मिळणार असल्याने येथील गोरगरिबांनी काहीसा सुटकेचा निश्वास सोडला आहे.
कडेगाव शहरात शिवभोजन योजनेचे एकाच केंद्र आहे. या केंद्राला दररोज १५० लोकांना जेवण देण्याची मान्यता आहे; परंतु लॉकडाऊनमध्ये लाभार्थी वाढण्याची शक्यता गृहीत धरून
शासनाने दररोज २२५ लोकांना मोफत जेवण देण्यास मान्यता दिली आहे.
शिवभोजन थाळीतून प्रत्येकी ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १५० ग्रॅम भात, १०० ग्रॅम वरण, १०० ग्रॅम भाजी दिली जाते. थाळीचे पार्सल लाभार्थी स्वतः येऊन घेऊन जात आहेत.
चौकट
फक्त गरजूच घेतात लाभ
फक्त गरजू लोकच शिवभोजन योजनेचा लाभ घेत आहेत. योजना सुरू झाली त्यावेळी १० रुपयांना थाळी दिली जात होती. गतवर्षी लॉकडाऊनपासून ५ रुपये झाली. आताच्या लॉकडाऊनमध्ये ती मोफत
दिली जाते, असे कडेगाव येथील शिवभोजन थाळी केंद्राचे चालक
सुनील मोहिते यांनी सांगितले.