सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ‘एफआरपी’नुसार शेतकऱ्यांना उसाची बिले दिलेली नाहीत. याप्रकरणी कारखान्यांवर कारवाई करण्याची गरज होती. पण, सहकारमंत्र्यांनी त्यांना वाचविण्यासाठी अटी शिथिल करून दिलासा दिला आहे. तसेच पॅकेजची घोषणा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसले आहेत. म्हणूनच दि. ६ जूनरोजी सहकारमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.ते पुढे म्हणाले की, साखरेचे दर गडगडल्यामुळे कारखान्यांकडे पूर्वीची साखर शिल्लक आहे. यातच नवीन साखरेचे उत्पादन वाढल्यामुळे त्यांची गोदामे सध्या भरली आहेत. साखरेचे दर उतरले म्हणून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी झालेला नाही. या शेतकऱ्यांच्या उसाला शासनाने ठरवून दिलेला किमान दर तर मिळालाच पाहिजे. परंतु, साखर कारखान्यांनी साखरेचे दर उतरल्यामुळे कारखान्यांचा उत्पादन खर्च वाढल्याचे सांगितले आहे. कारखाने अडचणीत असल्याचे कारण पुढे करून प्रशासनाने एफआरपीनुसार दर दिला नाही. जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांपैकी १२ कारखान्यांनी एफआरपीनुसार दर दिला नाही. या कारखान्यांकडे एफआरपीनुसारची शेतकऱ्यांची सुमारे २०४ कोटींची थकबाकी आहे. ही थकबाकी देण्यासाठी राज्य शासनाने दोन हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. परंतु, पॅकेज दिलेच नसल्यामुळे कारखानदार शासनाकडे बोट दाखवून शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. या घटनेचा निषेध म्हणून दि. ६ जून रोजी कोल्हापूर येथील सहकारमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘एफआरपी’साठी सहकारमंत्र्यांच्या घरावर शेतकऱ्यांचा ६ जूनला मोर्चा
By admin | Updated: May 26, 2015 00:52 IST